होशियारपूरमध्ये भाजपवर राहुल गांधींचे टीकास्त्र
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पूर्ण जोर लावला आहे. रविवारी काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांची प्रचारसभा आणि रोड शोनंतर सोमवारी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी होशियारपूर येथील सभेला संबोधित केले आहे. केंद्रातील भाजप सरकार हे दोन उद्योगपती चालवत आहेत. भाजपच्या केंद्र सरकारने शेतकऱयांना रस्त्यांवर उतरण्यास भाग पाडल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. स्वतःच्या भाषणादरम्यान राहुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी यांची नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांनी सिद्धू यांचा उल्लेख करत अनेक मुद्दय़ांवर टिप्पणी केली आहे.
पंजाबच्या शेतकऱयांच्या संघर्षामुळेच केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले आहेत. जर ही विधेयके लागू झाली असती तर पूर्ण देशातील शेतकऱयां फटका बसला असता. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी तीन महिन्यांमध्ये अनेक जनहिताची कामे केली आहेत. राज्यातील विजेचेदर कमी झाले असून पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यात आला आहे. या काळात प्रत्येक घटकासाठी काम करण्यात आल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
पंजाबमध्ये येत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अमली पदार्थांच्या मुद्दय़ावर टिप्पणी केली. परंतु अकाली-भाजप सरकार असताना त्यांनी याप्रकरणी मौन बाळगले होते. काही वर्षांपूर्वी पंजाब विद्यापीठात राज्यातील अमली पदार्थांच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा माझी थट्टा करण्यात आली होती. तेव्हा राहुल गांधी खोटं बोलत असल्याचे म्हटले गेले होते. परंतु त्या काळात भाजपकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱयांचे रक्षण केले जात होते असा आरोप राहुल यांनी केला आहे.
पंजाबमध्ये अमली पदार्थांची समस्या असल्याचे काँग्रेसला ज्ञात आहे. याचमुळे चन्नी सरकारने धडक कारवाई सुरू केली आहे. होशियारपूर हे शेतीचे केंद्र असून काँग्रेस सरकार येथे क्लस्टर तयार करणार आहे. येथे फूड पार्क आणि मशीन टूल्सचे क्लस्टर निर्माण होणार आहे. अरविंद केजरीवला हे पंजाबमध्ये येत दिल्ली मॉडेलबद्दल बोलत आहेत, परंतु दिल्लीत काहीच घडले नाही हेच सत्य आहे. दिल्लीत मोहल्ला क्लीनिकची सुरुवात शीला दीक्षित सरकारने केली होती असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.