प्रतिनिधी /मडगाव
मडगावातील मदार सय्यद या इसमाच्या मृत्यूप्रकरणी मडगावच्या सत्र न्यायालयाने 6 जणांना त्यांच्यावरील आरोपातून मुक्त करण्याचा आदेश दिला.
कालकोंडा -नावेली येथील 32 वर्षीय सेजल सय्यद, 27 वर्षीय आयुब सय्यद, खरेली -मडगाव येथील 28 वर्षीय अकबर मल्लाकट्टी, पेड -मडगाव येथील 24 वर्षीय विपूल पट्टारी, शिरवडे -नावेली येथील 25 वर्षीय मंजुनाथ उर्फ पांडय़ा तलवार आणि नावेली -शिरवडे येथील 23 वर्षीय अक्षय सुरेश जाधव हे या प्रकरणातील संशयित आरोपी होते.
सरकारक्षातर्फे सरकारी वकील डी. कोरगावकर, संशयित आरोपींच्यावतीने ऍड. एस. रेडकर, ऍड. एस. वेळीप आणि ऍड. के व्हिएगश यांनी काम पहिले.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार मदार सयय्द या व्यक्तीला मृत्यू येण्याची ही घटना फकीरबांद- कालकोंडा, मडगाव येथे 23 जुलै 2017 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला घडली होती. वरील सर्व संशयित आरोपींमध्ये एका वादावरुन हाणामारी चालली होती आणि त्यातील एक संशयित आपला बचाव करण्यासाठी तेथून धावत सुटला होता.
धावत जाणारा हा संशयित फकीरबांद कालकोंडा येथील सार्वजनिक संडासाच्याजवळ लपणार म्हणून गेला असता त्याचवेळी एका संडासातून बाहेर येत असलेल्या मदार याला या संशयिताची धडक बसली आणि मदार सय्यत संडासाजवळच कोसळला.
पाठलाग करीत असलेले इतर संशयित त्यावेळी तेथे पोहोचले आणि हाणामारी पुन्हा एकदा सुरु झाली. यावेळी एक इसम खाली पडलेला आहे याचे भान न राहिलेल्या या संशयितानी त्याला तुडविले. मदार जखमी झाले आणि उपचारादरम्यान 27 जुलै 2017 रोजी बांबोळी येथील इस्पितळात त्याने प्राण सोडला.
या खटल्याची सुनावणी न्यायालयात झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनाला असे आले की या प्रकरणातील संशयित आरोपीनी मुद्दामहून हे कृत्य केलेले नसून निष्काळजीपणामुळे मयताचा मृत्यू झालेला आहे.
आरोपी निश्चित करण्यावेळी ज्या कलमाखाली मडगाव पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद केला होता त्या कलमाखाली सकृत दर्शनी पुरावा नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सेंत डिसिल्वा यांच्या न्यायालयाने या प्रकरणातील वरील सर्व संशयिताना त्यांच्यावरील आरोपातून मुक्त करण्याचा शुक्रवारी आदेश दिला.