प्रतिनिधी/ बेळगाव
धर्मनाथ चौक ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या अशोकनगर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक घालण्यात आले आहेत. मात्र ईएसआय हॉस्पिटलकडे जाणाऱया ठिकाणी रस्ता सोडण्यात आला नसल्याने पादचाऱयांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. वृद्ध नागरिकांना दुभाजक ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याचा विकास मागील दीड वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही रस्त्याच्या दुतर्फा गटारी आणि डेनेज वाहिन्या घालण्याचे काम अपूर्ण आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी वाहने वळविण्यास दुभाजकामध्ये जागा सोडण्यात आली आहे. मात्र ईएसआय हॉस्पिटल आणि परिसरातील वसाहतीला जाणाऱया नागरिकांसाठी रस्ता सोडण्यात आला नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे. ईएसआय हॉस्पिटल किंवा या ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयात आणि महापालिका विभागीय कार्यालयात येणाऱया वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्गापर्यंत जाऊन वळसा घालून यावे लागत आहे. तसेच पादचाऱयांना देखील ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने दुभाजकावर चढून रस्ता ओलांडावा लागत आहे. ईएसआय हॉस्पिटलला व मालमत्ता कर भरण्यासाठी किंवा बेळगाव वन कार्यालयात ये-जा करणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कॉर्नरवर रस्ता सोडणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी रस्ता न सोडताच दुभाजक घालण्यात आल्याने वृद्ध नागरिकांसह महिला वर्गाला दुभाजक ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दुभाजक हटवून रस्ता केल्यास नागरिकांची गैरसोय टळणार
काही नागरिक बेळगाव वन कार्यालयात येण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा संकुलाच्या बाजूने उलट दिशेने वाहने चालवित येत असतात. त्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच ईएसआय हॉस्पिटलकडून राष्ट्रीय महामार्ग किंवा महांतेशनगरला जायचे असल्यास मनपा क्रीडा संकुलासमोरून वळसा घालून परत वर यावे लागत आहे. त्यामुळे काही वाहनधारक ईएसआय हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्याने उलट दिशेने थेट राष्ट्रीय महामार्गाकडे व महांतेशनगरला जात आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ईएसआय हॉस्पिटलच्या समोर दुभाजक हटवून रस्ता निर्माण केल्यास नागरिकांची गैरसोय कमी होणार आहे.
दखल घेण्यास टाळाटाळ
याबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता याबाबत दखल घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. यापूर्वी या ठिकाणी रस्ता सोडण्यात आला होता. त्यामुळे वाहनधारकांना सोयीचे होते. पण अलिकडे दुभाजक घालण्यात आल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याची पाहणी करून या ठिकाणी रस्ता सोडण्यात, यावा अशी मागणी होत आहे.