87 टक्के काम पूर्ण, उर्वरितांसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ई-केवायसी (बायोमेट्रिक ठसे) मोहीम सुरू केली आहे. मात्र लाभार्थ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अद्यापही बऱयाच लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली नाही. ई-केवायसीचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी खात्याने तीनवेळा मुदतीत वाढ केली आहे. मात्र अद्यापही जिल्हय़ात केवळ 87 टक्केच रेशनकार्डधारकांची ई-केवायसी झाली आहे.
रेशन दुकानदारांकडे ई-केवायसीचे काम सोपविले आहे. दुकानदारांकडून लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्यासाठी सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र लाभार्थी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच जिल्हय़ात ई-केवायसीचे काम पूर्ण झाले नाही. विवाह, मृत्यू व स्थलांतर झालेल्या लाभार्थ्यांच्या रेशनमधील गैरप्रकार रोखण्यासाठी खात्याने ई-केवायसीची मोहीम हाती घेतली आहे.
गतवषी कोरोनामुळे ई-केवायसीच्या मोहिमेला स्थगिती मिळाली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सप्टेंबरपासून ई-केवायसी केली जात आहे. जिल्हय़ात बीपीएल रेशनकार्डधारकांची संख्या 10 लाख 58 हजार 995 इतकी आहे. तर अंत्योदय कार्डधारकांची संख्या 68 हजार 665 इतकी आहे. त्यामध्ये आतापर्यंत 87 टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घेतली आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
सर्व्हरडाऊन आणि काही लाभार्थ्यांच्या अंगठय़ाचे ठसे उमटत नसल्याने ई-केवायसीच्या कामास विलंब होत आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा खात्याने मुदत वाढवली आहे.