प्रतिनिधी/ बेळगाव
उचगाव येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत आहेत. महापुरामुळे अनेकांची घरे कोसळली आहेत. त्यांना सरकारने निधी मंजूर केला आहे. तो निधी मिळताच त्यामधील रक्कम कर्जाला जमा करण्यात येत आहे. यामुळे घर बांधणे अवघड असून संबंधित व्यवस्थापकाला समज द्यावी, अशी मागणी उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, मण्णूर या गावच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापुरामध्ये ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना निधी मंजूर करण्यात आला. त्या निधीची रक्कम कर्नाटक विकास ग्रामीण बँकेमध्ये जमा होत आहे. मात्र रक्कम जमा होताच ती कर्जाला वर्ग करण्यात येत आहे. यामुळे रक्कम मंजूर होऊनही घर बांधणे अवघड झाले आहे. तेव्हा घर कोसळलेल्या कोणत्याही कर्जदाराची रक्कम कर्जाला जमा करू नये, अशी सक्त ताकीद बँकेच्या व्यवस्थापकांना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
सर्वसामान्य जनता आणि महिला बँकेमध्ये गेल्यानंतर उद्धट उत्तरे देण्यात येत आहेत. नवीन खाते काढण्यासाठी तीन-चार महिने पळापळ करावी लागत आहे. ग्राहकांचा अपमान करायचा, तुम्ही अनाडी आहे तुम्हाला सांगून काय साध्य होत नाही, असे व्यवस्थापक छेडत आहेत, असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. महिला संघाची खाती काढतानादेखील त्रास देण्यात येत आहे. एकूणच व्यवस्थापक उद्धट उत्तरे देत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. एन. आर. लातूर, सुनील गावडे, किरण चौगुले, धाकलु चिक्के, हरिष मंडोळकर, जोतिबा पाटील, नारायण मोरे, लक्ष्मण गावडे, योगिता गावडे, गीता सावंत, लक्ष्मी हलगेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..