वार्ताहर /उचगाव
मण्णूर ते पंपिंग स्टेशन व आंबेवाडी ते पंपिंग स्टेशन या दोन रस्त्यांची उंची वाढवल्याने पावसाळय़ात मार्कंडेय नदीला येणारा महापूर व राकसकोप जलाशयातून सोडण्यात येणाऱया अतिरिक्त पाण्याचा साठा तर सुळगा गावाजवळून वाहणाऱया केंबाळी नाल्याच्या पाण्यामुळे पावसाळय़ात सुळगा व हिंडलगा या भागातील हजारो एकरातील भात, ऊस पिके दरवषी पाण्याखाली जाऊन हा संपूर्ण भाग जलमय होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाला या भागातील पिकांना मुकावे लागत आहे. पावसाळय़ात हा परिसर समुद्र असल्याचे भासतो. या भागातून जाणाऱया रस्त्यांची उंची वाढविल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी आत्ताच यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील शेतकरीवर्गाने केली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने मार्कंडेय नदीला येणाऱया पाण्याच्या प्रवाहामुळे मण्णूर ते पंपिंग स्टेशन व आंबेवाडी ते पंपिंग स्टेशन या दोन रस्त्यांची चाळण झाली. हे रस्ते अनेक ठिकाणी वाहून गेले. परिणामी या रस्त्यांची दुरुस्ती आणि उंची वाढविणे गरजेचे होते. त्यानुसार शासनाने या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती आणि उंची वाढविण्याचे काम हाती घेतले. मात्र या रस्त्यांची उंची वाढल्याने वाहून जाणारे पाणी साठून राहिल्याने फार मोठय़ा समस्यांना शेतकरीवर्गाला सामोरे जावे लागत आहे.
नियोजनाअभावी भात-ऊस पिकांचे नुकसान
सदर दोन्ही रस्ते करताना त्यांची उंची वाढवियात आली आहे. या कारणामुळे पावसात तसेच राकसकोप जलाशयातून सोडण्यात येणाऱया अतिरिक्त पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलेले नाही. या कारणामुळे सुळगे हिंडलगापासून आलेल्या केंबाळी नाल्याचे पाणी व राकसकोप जलाशयातून येणारे अतिरिक्त पाणी दक्षिणेकडील बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यापर्यंत केंबाळी नाल्यापर्यंत असलेल्या शेतात मोठय़ा प्रमाणात साचून राहते. येथील हजारो एकर शिवारातील भात व ऊस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. सदर रस्त्यांची उंची वाढविल्याने हे पाणी साचून राहत आहे.
सदर जमीन भात व ऊस पिकासाठी चांगली असल्याने सदर पिकेही भरघोस येतात. मात्र गेल्या दोन-चार वर्षात अति पावसामुळे मार्कंडेय नदीला येणारा पूर कमी होत नसल्याने पिके कुजून शेतकऱयांचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी शासनाने पाण्याचा विसर्ग होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी असंख्य शेतकरीवर्गाने केली आहे.
रस्त्याशेजारी गटारी खणून पाईप घालावेत
या दोन्ही गावांच्या रस्त्यांचा संपर्क पंपिंग स्टेशनपर्यंत येतो. या दोन्ही गावांच्या संपर्कासाठी रस्त्यांची उंची वाढविली आहे. या रस्त्यांमध्ये मोठे पाईप घालून पाण्याचा निचरा करावा. पाईप घातलेल्या ठिकाणी शेती आणि पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारी खोदून पाणी मार्कंडेय नदीपात्रात सोडण्याची व्यवस्था करावी. यासाठी शासनाने रस्त्यांची कामे पूर्णत्वाला नेण्यापूर्वी उपाययोजना कराव्यात. पश्चिम भागातील निर्माण झालेली ही मोठी समस्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लक्ष घालून तातडीने मिटवावी, अशी मागणी शेतकऱयांतून करण्यात येत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीने भेट घेण्यात येणार आहे.
संबंधितांना लवकरच निवेदन देणार
या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन या भागातील शेतकरीवर्गाने देण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खाते व शासनाने या दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीबरोबरच दोन्ही बाजूला गटारी व पाणी निचरा होण्यासाठी पाईप घालून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी या भागातील असंख्य शेतकऱयांनी केली आहे.