पिंपळनेर / वार्ताहर
उजनी धरणातून कालव्याला 20ते 21 तारखेला तर भीमा नदीला 23 तारखेला उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार बबनराव शिंदे यांनी आग्रही मागणी केल्याने त्यांनी पाणी सोडण्याचे मान्य केले तर याबरोबरच सीना नदी, सीना माढा उपसा सिंचन या योजनांना देखील पाणी सोडले जाणार आहे.
उन्हाळ्याची तीव्रता सध्या जाणवू लागलेमुळे कालव्याला व नदीला पाणी मागणी वाढु लागलेली आहे. प्रत्येक भागातून शेतकरी आ.शिंदे यांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी करत होते. त्यातच शेतकऱयांना गेली वर्षभर झाले कोरोनामुळे प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागतोय. शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नाही. मार्च महिना लागल्याने उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे आ. बबनराव शिंदे यांनी शेतकऱयांच्या हितासाठी पाठपुरावा केला व या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
शेतकऱयांना फायदा व्हावा अशी अपेक्षा
उजनी धरणामधे सद्यस्थितीला प्लस 64 टक्के पाणीसाठा असून धरणात पाणी मुबलक असल्याने शेतकऱयांना पिकांना फायदा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. या पाण्यामुळे ऊस,केळी,द्राक्ष,मका,भुईमूग,मुग या पिकांना फायदा होणार आहे. हे आवर्तन मार्च ते एप्रिल या महिन्यात देण्यात येणार आहे. हे आवर्तन संपल्यावर उन्हाळी हंगामात दुसरे आवर्तनही सोडण्यात येणार आहे.– बबनराव शिंदे, आमदार