नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱया गॅस सिलिंडरच्या अनुदानाला एका वर्षाची कालावधीवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक सिलिंडरमागे 200 रुपयांची सूट ग्राहकाला दिली जाते. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीतही वाढ करण्यात आल्याचे वृत्त आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱया अनुदानाचा लाभ 9.6 कोटी लोकांना होणार आहे. या अनुदान योजनेमुळे या लाभधारकांना प्रतिवर्ष 12 गॅस सिलिंडर 200 रुपयांच्या अनुदानासह मिळतात. जागतिक परिस्थितीमुळे स्वयंपाकाच्या गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, गरीबांना या वाढीची झळ पोहचू नये, म्हणून अनुदानाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उज्ज्वला गॅस सिलिंडरच्या अनुदानाच्या कालावधीत वाढ केल्याने केंद्र सरकारच्या खर्चात या आर्थिक वर्षात 6.100 कोटी रुपये वाढ होणार आहे. तसेच पुढील वित्त वर्षात ही वाढ 7,680 कोटी रुपयांची होणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.