डॉ. संध्या देशपांडे यांचे प्रतिपादन : समादेवीच्या उत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
समाजाचे सांस्कृतिक पोषण करून समाज संघटित करण्यासाठी व मानवी समुहाची निकोप वाढ होण्यासाठी उत्सवाचे पावित्र्य सांभाळायला हवे. उत्सव करताना आपण अंर्तमुख होऊया आणि समादेवीचा उत्सव करताना स्त्री शक्ती म्हणजे विश्वचेतना आहे, याचे भान ठेवून कार्यरत राहूया, असे आवाहन प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनी केले.
सालाबादप्रमाणे समादेवी गल्ली येथील समादेवी संस्थान समादेवीच्या उत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित हा उत्सव दि. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यानिमित्त आयोजित देवी दरबारचे उद्घाटन केल्यानंतर संध्या देशपांडे बोलत होत्या. व्यासपीठावर निर्मला कणबर्गी, उज्ज्वला बैलूर, वर्षा सटवाणी, शिला बिडीकर, दत्ता कणबर्गी, भाई दोरकाडी, अमित कुडतूरकर उपस्थित होते.
संध्या देशपांडे म्हणाल्या, उत्सवासंदर्भात आपण चंगळवादी नव्हे तर तत्त्वज्ञ व्हायला हवे. शुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास महत्त्वाचा, असे गुरुदेव रानडे सांगतात. जगण्याच्या क्षेत्रात माणूस घडविण्याचे काम महत्त्वाचे आहे. तत्त्वज्ञानाच्या बळावर भारत जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, असा गुरुदेवांचा विश्वास होता. फक्त त्यासाठी कुठे थांबायचे, हे आपल्याला कळायला हवे.
व्यवसायाने सत्व-नैतिकता जोपासली पाहिजे
प्रत्येक व्यवसायाने सत्व आणि नैतिकता जोपासली पाहिजे. नुरजहाँ, जोनऑफ आर्क अशा अनेक स्त्रियांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे. जगाला कॅन्सर मुक्त करण्यासाठी मेरी क्मयुरीने संशोधन केले. कमला सोहनी पहिल्या महिला शास्त्रज्ञ ठरल्या. स्त्रिया उदंड असे सामाजिक कार्य करू शकतात. येणारा काळ स्त्रियांचाच आहे. त्यामुळे झेपेल तेवढे समाजकार्य करूया आणि नवीन विक्रम घडवूया, असे ही त्यांनी सांगितले.
प्रारंभी लक्ष्मी बिडीकर, अश्विनी व अक्षता कलघटगी यांनी स्वागतगीत सादर केले. दत्ता कणबर्गी यांनी स्वागत करताना व्यापारी वर्गांनी व्यापाराच्यानिमित्ताने दूरवर जावून संस्कृती जपली आहे. व्यापारातील पैसा समाजासाठी खर्चही केला आहे, असे सांगितले. मंडळाच्या अध्यक्षा शिला बिडीकर यांनी प्रास्ताविक करून वक्त्यांचा सत्कार केला. वंदना मालशेट यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनीषा हणमशेट यांनी केले. अक्षता कलघटगी यांनी आभार मानले.