50 टक्के क्षमतेनेच चालविण्याचे आदेश, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान बंद पडलेले अनेक उद्योग पुन्हा एकदा सुरू होण्याच्या मार्गावर असून सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असलेल्या पॅसिनोंसह पर्यटनाशी संबंधित अन्य अनेक उद्योग उद्या सोमवारपासून लोकसेवेत रुजू होणार आहेत. मात्र त्यासाठी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे लागणार आहे. त्याशिवाय गर्दीची शक्यता असलेल्या ठिकाणी 50 टक्के क्षमतेनेच ग्राहकांना प्रवेश द्यावा लागणार आहे.
शनिवारी सायंकाळी पर्वरी सचिवालयात झालेल्या कृतिदलाच्या बैठकीत त्यासंबंधी निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कोरोना महामारीमुळे विस्कटलेली अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा नीट बसविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पॅसिनोआदी उद्योग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोरोना महामारीत अनेक उद्योग व्यवसाय पूर्णतः ठप्प झाले होते. त्यात खास करून पर्यटनाशी संबंधित उद्योगांनाच सर्वाधिक फटका बसला होता. या उद्योगाचाच भाग असलेले ऑनशोर व ऑफशोर पॅसिनो महामारीत भरडले गेले होते. झगमगाटाची ही नवी दुनिया अंधःकारमय झाली होती. आता सोमवारपासून मांडवी नदीत नवा जल्लोष पहायला मिळणार आहे. मात्र तो 50 टक्क्यांच्या मर्यादित क्षमतेतच चालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व मार्गदर्शक तत्वांचे कठोरतेने पालन, खबरदारीचे सर्व उपाय तसेच प्रत्येक ग्राहकाची तपासणी केल्यानंतरच प्रवेश देण्यात येणार आहे.
तज्ञ समितीच्या सूचनेनुसार कोरोनाच्या रोजच्या बाधित संख्येचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील अनेक उद्योग धंदे सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने पॅसिनोंचा समावेश आहे. त्याच धर्तीवर स्पा आणि मसाज पार्लरही सुरू होणार आहेत. रिव्हर क्रूजही लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. ईडीएम, नाईट क्लब यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत अन्य अनेक विषयांवरही चर्चा झाली. शैक्षणिक संस्था सुरू करण्याबद्दल विचारविनिमय झाला. त्यावर तज्ञ समितींशी पुन्हा एकदा सखोल चर्चा व शक्याशक्यतांचा विचार करून निर्णय घ्यावा व कृतीदलास कळवावे, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.