वकिलांचे जिल्हा नोंदणी अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
उपनोंदणी कार्यालयातील काम समाधानकारक नाही. बोजा प्रमाणपत्र ऑनलाईनद्वारे दिले जात आहे. मात्र त्यामध्ये अधिकवेळ जात आहे. विवाह नोंदणीसाठी अधिक रक्कम उकळण्यात येत आहे. याचबरोबर प्रत्येक कामाला पैसे घेण्यात येत आहेत. तेंव्हा त्याची चौकशी करून उपनोंदणी कार्यालयाचा कारभार सुधारावा, अशी मागणी वकिलांनी जिल्हा नोंदणी अधिकारी महांतेश पटातर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वात जास्त महसूल देणारे कार्यालय म्हणून उपनोंदणी कार्यालयाकडे पाहिले जाते. या कार्यालयामध्ये खरेदी-विक्रीसह, बोजा प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, उताऱयांवर नावे दाखल करणे अशी कामे केली जातात. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. मात्र याची संधी साधत येथील कर्मचारी माने हा 900 रुपये विवाह नोंदणीसाठी घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा भुर्दंड बसत आहे. तेंव्हा त्याची चौकशी करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जिल्हा नोंदणी अधिकारी महांतेश पटातर यांनी निवेदन स्वीकारून त्याची चौकशी करू, याचबरोबर कामामध्ये सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलू, असे आश्वासन दिले. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, ऍड. सुनील काकतकर, ऍड. नंदकुमार देसाई, ऍड. विनोद घसारी, ऍड. दीपक औराडकर, ऍड. संतोष गडकरी, ऍड. बी. डी. कोलकार यांच्यासह वकील उपस्थित होते.