शेवटची साखळी लढत जिंकण्यासाठी भारतीय संघ महत्त्वाकांक्षी, साखळी फेरीअखेर अव्वलमानांकन कायम राखण्याचे लक्ष्य
ढाका / वृत्तसंस्था
आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित करणाऱया भारतीय संघाची आज (रविवार दि. 19) जपानविरुद्ध शेवटची साखळी लढत होत आहे. राऊंड रॉबिनमधील भारताचा हा शेवटचा सामना असेल.
या स्पर्धेत संथ सुरुवात करणाऱया ऑलिम्पिक कांस्यजेत्या भारतीय संघाने सलग 2 विजय नोंदवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असले तरी साखळी फेरीची विजयी सांगता करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. यंदा या स्पर्धेत 5 संघ सहभागी झाले आहेत.
ऐतिहासिक ऑलिम्पिक मोहिमेनंतर पहिल्याच स्पर्धेत सहभागी होत असताना भारताला कोरियाने 2-2 अशा बरोबरीत रोखून धरले. पण, नंतर भारताने आपला खेळ अतिशय उत्तमरित्या उंचावत यजमान बांगलादेशचा 9-0 असा एकतर्फी फडशा पाडला तर नंतर शुक्रवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा देखील 3-1 असा धुव्वा उडवला.
भारतीय संघ गुणतालिकेत आता 7 गुणांसह आघाडीवर असून कोरियाच्या खात्यावर 5, जपानच्या खात्यावर 2 तर पाकिस्तानच्या खात्यावर 1 गुण नोंद आहे. यजमान बांगलादेशने आपले पहिले दोन्ही सामने गमावले असून यामुळे गुणतालिकेत त्यांची पाटी अद्याप कोरी आहे. या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणूनच उतरलेल्या भारतीय संघाने अन्य संघांच्या तुलनेत बराच सरस खेळ साकारला आहे. फॉर्म व जागतिक मानांकन या दोन्ही निकषावर त्यांनी आपले वर्चस्व अबाधित राखले आहे.
यंदा, या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने 2 गोलांची उत्तम आघाडी प्राप्त केली होती. मात्र, नंतर अचानक कोरियाने लागोपाठ 2 गोल करत अनपेक्षित बरोबरी मिळवली. हा निकाल आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. एका अर्थाने ही लढत भारतासाठी वेकअप कॉल देणारी ठरली. या अनुभवावरुन आपल्या खेळात अधिक प्रगल्भता आणत सलग दोन विजय संपादन केले. भारताने बांगलादेशविरुद्ध 90 मिनिटांच्या निर्धारित खेळात एककलमी वर्चस्व गाजवले तर विजयाची ही मालिका पाकिस्तानविरुद्ध पुढील लढतीत देखील कायम ठेवली.
भारताने पाकिस्तानविरुद्ध लढतीत पहिल्या दोन्ही क्वॉर्टर्समध्ये वर्चस्व गाजवले. त्यांनी आठव्या मिनिटाला पहिला गोल केला व 42 व्या मिनिटाला गोलआघाडी 2-0 अशी आणखी भक्कम केली. शेवटच्या 15 मिनिटात पाकिस्तानने आक्रमक खेळावर भर दिला. मात्र, भक्कम बचावाच्या बळावर भारताने त्यांना फारशी संधी दिली नाही. ललित उपाध्याय, आकाशदीप सिंग व दिलप्रीत सिंग यांचा बहारदार खेळ भारतीय संघासाठी विशेष महत्त्वाचा ठरत आला आहे.
कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली मध्यफळीने उत्तम योगदान दिले असून उपकर्णधार हनमनप्रीत सिंगने बॅकलाईनची आघाडी उत्तम सांभाळली आहे. युवा गोलरक्षक सुरज करकेराने अप्रतिम गोलरक्षण करत विशेषतः पाकिस्तानविरुद्ध विजयात मोलाचा वाटा उचलला. भारत-जपान यांच्यात शेवटची लढत टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाली. त्यात भारताने 5-3 अशा फरकाने बाजी मारली. मात्र, मागील लढतीचा फारसा फरक पडणार नाही, भारताला येथे नव्याने सुरुवात करावी लागेल, हे साहजिक आहे.