10 किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मागणीनुसार मिळणार
प्रतिनिधी / सातारा
उरमोडी नदीवर परळी येथे झालेल्या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर परळी भागाला पाणी मिळेल की नाही याची शक्यता धुसर बनली होती. मात्र, स्थानिकांचा त्या पाण्यावर पहिला अधिकार आहे हे वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींनी निक्षून सांगितले. उरमोडीचे पाणी कण्हेरमध्ये आणि कण्हेरचे पाणी सांगलीला जात होते. त्याबाबत नेहमीचे वादाचे पडसाद उमटत होते. आता मात्र, बुधवारी उरमोडीच्या उजव्या कालव्याचे दहा किलोमीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी पाण्याचे टेस्टिंग करण्यात आले. त्यामुळे शेतकऱयांना आता मागणीनुसार पाणी मिळणार आहे.
उरमोडी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे टेस्टींग शाखा अभियंता कदम यांच्यासह आर.आर.कन्स्ट्रक्शनचे प्रमुख यांनी बुधवारी केले. हे पाणी परळी भागात दहा किलोमीटरपर्यंत झालेल्या कालव्यामध्ये कुठे गळती आहे काय?, कालव्याचे काम कशा पद्धतीने झाले आहे याची तपासणी करण्यात आली. कालव्याचे पाणी परळी भागातील भोंदवडे, गजवडी, सोनवडी, आरे, पोगरवाडी, जरेवाडी, करंडी, उपळी, आष्टे या गावांना मिळणार आहे. कालव्याला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी आर्वजून कॅनॉलला भेटी दिल्या होत्या. याबाबत करंडीचे सरपंच शशिकांत जाधव म्हणाले, सात महिन्यापूर्वी कॅनॉलचे काम झाले आहे. तांत्रिक तपासणीच्या कारणास्तव पाणी सोडले गेले आहे. कोरोनामुळे कार्यक्रम पुढे ढकलला आहे. आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते पाणी पुजन करण्यात येणार आहे. या पाण्यामुळे परळी भागातील शेती पाण्याखाली येणार आहे, असे त्यांनी सांगितले.