कोरोना महामारी, ढगफुटी व महापुराचे तडाखे यातून जनजीवन अजून सावरलेले नाही. तोपर्यंत राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली आहे. पारा चढला आहे, काही ठिकाणी तो चाळीस अंशावर गेला आहे, निसर्ग संतापलेला आहे. आता ही लाट काय तापमान दाखवते आणि कुणाकुणाला फटके देते हे बघायचे, पण निसर्गाचा रूद्रावतार माणसांना, प्राणीमात्रांना फटके देतो आहे. अर्थात ही जी सारी अवस्था निर्माण झाली आहे त्याला माणूसच कारणीभूत आहे. माणसाचे वर्तन, माणसाची पिपासुवृत्ती आणि कोणतेही नियम, निर्बंध न पाळता बेछूट, बेपर्वा वागणूक यांची ही फळे आहेत. खरेतर होळी किंवा हुताशनी पौर्णिमा म्हणजे थंडीची अखेर आणि उन्हाळय़ाला प्रारंभ. आपल्याकडे म्हणजे भारतात सहा ऋतुंचे सहा सोहळे असतात आणि फाल्गून झाला की पाठोपाठ चैत्र येतो आणि चैत्र म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन. नवचैतन्याचे, नवउन्मेषाचे हे दिवस. झाडांना नवी पालवी येते. कोकीळेचा कुहुकुहु सुरु होतो आणि डोंगरची मैना आणि कोकणचा राजा हापूस याचा मधूर पदन्यास सुरु होतो. किती आनंददायी, आल्हाददायक, सुःखद आणि मनोहरी असे हे दिवस आणि वसंत ऋतु, पण गेली काहीवर्षे देशाचा व जगाचा नूरच बदलला आहे. माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीही बदलल्या आहेत. चंगळवाद आणि बेछूट वर्तन, निसर्गाची हानी याचे परिणाम दिसामागे वाढत आहेत आणि सुमारे पन्नास वर्षापूर्वी फारशी कुणाला माहिती नसलेली ढगफुटी, उष्णतेची लाट, हिमवर्षाव, लालपाऊस, धुरकट हवामान, नदीत मृत माशांचा तरंग, चिमण्या गायब, पोपटांचे थवेच्या थवे मृत या व अशा वास्तवाला सामोरे जावे लागताना दिसत आहे. बदललेले वातावरण व पर्यावरण यांचे शेतीला, माणसांना, पक्षांना आणि प्राणीमात्रांना तडाखे बसत आहेत. मुंबईची तुंबई नित्याचीच झाली आहे. ढगफुटी आणि भयानक पाऊस यामुळे कृष्णेसह राज्यातले नदीकाठ कायम तणावाखाली आहेत. कोकणात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रासह इतरत्र वादळ, महापूर, उष्णता, कडाक्याची थंडी यांचे पाठोपाठचे तडाखे लोकजीवन उद्ध्वस्त करत आहेत आणि निसर्गाचे हे फटके कमी म्हणून त्यात कोरोना महामारी व जागतिक युद्ध व मंदीचे तडाखे सोसावे लागत आहेत. राज्यातले सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा गौरवाने उल्लेख होतो. आज तेथे तापमान 31 अंशावर आहे. तर कोल्हापूरचा पारा 38 अंशावर आहे. वर्धा जिह्यात पारा 40 अंशावर गेला आहे. अकोला, अमरावती, पुणे, सांगली, नांदेड ही सारी शहरे तापली आहेत. नमनालाच ही अवस्था तर मग एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार ही भितीच आहे. महावृष्टी, महापूर, महाउष्णता, महाथंडी ही हळूहळू नित्याचीच होत आहे. हे दुर्दैव आहे. त्यावर निसर्गरक्षण व संवर्धन हा कळीचा मुद्दा आहे. हा कळीचा मुद्दा समजतो आहे पण त्याप्रमाणे वर्तन घडत नाही. ही समस्या आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी केले पाहिजे. वनक्षेत्र जपले पाहिजे. नवीन जंगले निर्माण केली पाहिजेत. पाणी, हवा जमीन यांचे प्रदूषण रोखले पाहिजे. पक्षी-प्राणी यांचे संवर्धन केले पाहिजे असे शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञ वारंवार व वर्षानुवर्षे सांगत आहेत. पण आम्ही दरवर्षी त्याच खड्डय़ात झाड लावतो, सरकारी पैसा खर्च करतो आणि पर्यावरण रक्षणासाठी पाठ थोपटून घेतो. जागतिक तापमान परिषदेत या संदर्भात चर्चा व ठराव आले आहेत. पण ठराव कागदावर आणि चर्चा परिषदेपुरती अशी अवस्था दिसते आहे. कुणीही नियम पाळत नाही. आधुनिक जगाचे जे निकष आहेत त्यामध्ये ज्या देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली तो देश चांगला मानला जातो. पण आपल्याकडे घरटी एक दोन गाडय़ा आहेत. चार चाकी गाडीतून Eिहडणे हा स्टेटस सिंबॉल बनला आहे. खरेतर डिझेल, पेट्रोलचा इतका धूर काढणे योग्य नाही. शासनाने तुलनेने चांगली, सोईची व स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केली तर हा धूर थोडा कमी निघेल. पण आज महाराष्ट्राची एस. टी. गचके खाते आहे आणि ओला वगैरे सुविधा सर्वदूर नाहीत. होळीचा मुहूर्त गाठून आलेली उष्णतेची लाट पुढील काही दिवस राहिल असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. गुजरात व राजस्थानमध्ये तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्टय़ांमुळे तापमानात ही वाढ झाली आहे. समुद्रकिनारी येणारे वारे उशीरा येत आहेत. त्यामुळे, रत्नागिरी, मुंबई, सिंधुदूर्गाचाही पारा चढला आहे. ही तापमान वाढ सध्या 40 ते 41 अंशावर पोहोचली आहे. गोवा, कोकण, उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले असा होरा आहे. तापमानापाठोपाठ काही भागात पावसाचा अंदाज आहे हे सारे अंदाज आणि वाढलेली उष्णता, पोटात गोळा आणणारी आहे. कोकणात हापूस आंबा पिकला तर काही भागात द्राक्ष व अन्य फळबागांना या तापमानवाढीचा फटका बसणार आहे. सुदैवाने राज्यातील धरणे, बंधारे यामध्ये पाणी आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई नाही आणि राज्य सरकारने कृषिपंपाच्या बिलासाठी वीजतोडणी 3 महिने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषिपंपाचा खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. पण एकिकडे उष्णतेचे चटके, शेतीचे नुकसान आणि दुसरीकडे कर्जाचे, बिलाचे जाच यामध्ये बळीराजा भरडला जातोय. शेतकऱयामागचे नष्टचर्य संपता संपत नाही. वाढलेल्या तापमानाचा पक्षी, प्राणी यांच्यावरही गंभीर परिणाम होतो आहे. चिमणी, कावळे, मैना, पोपट, बुलबुल, खंडय़ा, घारी असे पक्षी पूर्वीसारखे नजरेत पडत नाहीत आणि वाढलेले तापमान या प्राण्यांना सहन होत नाही. भटके प्राणी, पक्षी यांच्यासाठी पाणी ठेवा असे आवाहन सोशल मिडियावरुन केले जाते. अनेक अर्थांनी ते योग्य आहे, तथापि अभयारण्ये, पक्षी अभयारण्ये आणि वने, उद्याने येथे प्राणी, पक्षी यांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली पाहिजे. पाळीव प्राणी, पक्षी यांना तसेच लहान मुले, वृद्ध माणसे यांना या उष्णतेच्या दिवसात जपले पाहिजे. होळी पौर्णिमा आणि धुलीवंदन म्हणजे जे हिन, चुकीचे ते टाकून देणे आणि चांगले ते स्वीकारणे, तापमानवाढ आणि उष्णतेची लाट या पार्श्वभूमीवर आपण सजग झाले पाहिजे.
Previous Articleजे क्षणोक्षणी नवनवीन वाटते, ते खरे सौंदर्य
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.