चेअरमन निखिल कत्ती : ‘हिरण्यकेशी’ची 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
प्रतिनिधी/ बेळगाव
हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या व्याप्तीत येणाऱया उस उत्पादकांवर अन्याय होऊ नये, यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक आमदार उमेश कत्ती व बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या सल्ल्यानुसार कारखान्याच्या सभासदांची संख्या 12 हजारांवरून 31 हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याचा हजारो शेतकऱयांना लाभ झाला आहे. मात्र, काही सभासद पिकविलेला ऊस दुसऱया साखर कारखान्याला पाठवित आहेत. त्यामुळे अशा सभासदांची साखर बंद करण्यात येणार आहे. तसेच यापुढे कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या सभासदांनाच साखर दिली जाईल, असे कारखान्याचे चेअरमन निखिल कत्ती यांनी सांगितले. कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
निखिल कत्ती पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या मार्गसुचिनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यात आली. कारखान्याच्या व्याप्तीतील शेतकऱयांनी नियमितपणे ऊसाचे उत्पादन घ्यावे. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. पण, सभासद व शेतकरी कारखान्याला ऊस पुरवठा न करता दुसरीकडे पाठवित असल्याने कारखान्याला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यापुढेही असेच सुरू राहिल्यास कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची वेळ येणार आहे, असे सांगितले.
यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 4,84,748 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून 5,19,900 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन निखिल कत्ती यांनी केले. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक पाटील यांनी अहवाल वाचन केले. यावेळी व्हा. चेअरमन श्रीशैलप्पा मगदूम, सचिव प्रल्हाद पाटील, शिवनाईक नाईक, राजकुमार पाटील, उदयकुमार देसाई, सुरेश बेल्लद, बसवराज कल्लट्टी, पी. जी. घाळी, राचय्या हिरेमठ, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष कल्लप्पा पाटील, एपीएमसी सचिव प्रशांत पाटील, सत्तेप्पा चंदरगी, दिलीप वाळीमिंडी, दुंडप्पा हेद्दूरी, आण्णासाहेब पाटील, सुरेश कुलकर्णी, जयसिंग सनदी आदी उपस्थित हेते. कारखान्याचे अधीक्षक एस. आर. कर्कीनाईक यांनी सूत्रसंचालन केले.