मायदेशी परतल्यानंतर प्रतिपादन, आता इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी महत्त्वाकांक्षी असल्याचा दावा
कोलकाता / वृत्तसंस्था
ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियात फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आणि आता प्रचंड टीकेचे लक्ष्य ठरत आलेले त्याचे यष्टीरक्षणही सुधारेल, असा विश्वास वरिष्ठ यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने व्यक्त केला. कोणीही बीजगणित पहिल्या इयत्तेत शिकत नसते, असा दाखला त्याने येथे दिला. अर्थात, पंतने ऑस्ट्रेलिया गाजवले असले तरी यामुळे आपल्यासाठी कसोटी संघाचे दरवाजे बंद झाले आहेत, असे आपण अजिबात मानत नाही, याचाही साहाने उल्लेख केला.
‘तुम्ही हे अगदी पंतला देखील विचारु शकता. पण, माझे व त्याचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. आमच्यापैकी ज्याला अंतिम संघात संधी मिळते, त्याला आम्ही परस्परपूरक सहकार्य करतो. वैयक्तिक स्तरावर माझे त्याच्याशी काहीही मतभेद नसतात’, असे साहा म्हणाला. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकून मायदेशी परतल्यानंतर तो वृत्तसंस्थेशी बोलत होता.
‘कोण अव्वल क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे आणि कोण दुसऱया क्रमांकाचा, अशी क्रमवारी आम्ही लावत नाही. जो सरस असेल, त्याला संघव्यवस्थापन संधी देईल. प्रत्येक जण आपल्या स्तरावर मेहनत करत असतो. सरतेशेवटी संघनिवड माझ्या हाती नाही. ते व्यवस्थापन ठरवत असते’, असे साहा पुढे म्हणाला.
‘कोणीही थेट बीजगणित शिकत नाही. प्रत्येकाला पहिल्या इयत्तेपासून धडे गिरवत जायचे असते. ऋषभ प्रगल्भ आहे आणि त्याने अनेक स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे. टी-20 व वनडे या त्याच्या पसंतीच्या क्रिकेट प्रकारात वगळले गेल्यानंतरही त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मनापासून खेळ साकारला आणि मिळालेल्या संधीचे सोने केले’, असे साहा एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला. पंतने ब्रिस्बेन कसोटी जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलल्यानंतर त्याची थेट धोनीशी तुलना केली गेली. पण, साहाच्या मते धोनी हा धोनी आहे आणि प्रत्येक खेळाडूची स्वतंत्र ओळख असते.
साहाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली. मात्र, त्याला अनुक्रमे 9 व 4 धावा करता आल्या. याच लढतीत भारताचा डाव 36 धावात खुर्दा झाला होता. नंतर उर्वरित तिन्ही कसोटीत साहाला संघातून बाहेर रहावे लागले.
‘कोणत्याही खेळाडूला खराब फॉर्ममधून जावे लागू शकते. व्यावसायिक खेळाडूला असे चढउतार स्वीकारावेच लागतात. मला धावा करता आल्या नाहीत. म्हणूनच पंतला संधी मिळाली. तूर्तास, कौशल्य विकसित करण्यावर माझा भर आहे, इतकेच मी सांगू शकेन’, याचा त्याने पुढे उल्लेख केला. मालिकेतील एका डावात 36 धावात खुर्दा व्हावे लागल्यानंतर संघाने ती मालिकाच जिंकली, हे एका अर्थाने वर्ल्डकप जिंकल्यासारखेच आहे, असे साहाने नमूद केले. मी मालिकेतील तीन सामने खेळले नाहीत. पण, या मालिकेचा पुरेपूर आनंद लुटला, असे तो म्हणाला.
इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी उभयतांचाही समावेश
इंग्लंडचा संघ लवकरच भारत दौऱयावर येणार असून 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेने दौऱयाचा श्रीगणेशा होईल. या मालिकेकरिता ऋषभ पंत व वृद्धिमान साहा या उभयतांचाही भारतीय संघात समावेश असून प्रत्यक्ष लढतीत स्पेशालिस्ट यष्टीरक्षक म्हणून साहाला संधी दिली जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सिराज हे ऑस्ट्रेलिया दौऱयाचे ‘फाईंड’ – रवी शास्त्री
पितृशोक व स्थानिक प्रेक्षकांकडून वंशद्वेषी टिपणी असे दुहेरी धक्के सोसावे लागल्यानंतरही सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळ साकारला. आमच्या दृष्टीने सिराज हा ऑस्ट्रेलिया दौऱयाचे ‘फाईंड’ आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ट्वीटरवर म्हणाले. सिराजने या दौऱयात एकूण 13 बळी घेतले आणि भारताने 2-1 असा धमाकेदार मालिकाविजय संपादन केला.
सिराजला मेलबर्नमधील कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानंतर ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटीत गोलंदाजी आघाडीचे नेतृत्व भूषवत त्याने संघव्यवस्थापनाचा विश्वासही सार्थ ठरवला. 150 धावात 7 बळी, हे त्याचे सामन्यातील पृथक्करण कलाटणी देणारे ठरले. मायदेशी परतल्यानंतर सिराज थेट दफनभूमीकडे गेला आणि वडिलांना त्याने पुष्प अर्पण केले. ऑस्ट्रेलियातील आपले यश त्याने वडिलांना समर्पित केल्याचे सांगितले.
रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदरचे मायदेशी आगमन
चेन्नई – ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन व नवोदित अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर शुक्रवारी चेन्नईत दाखल झाले. राज्य प्रशासनाच्या नियमानुसार, ते आता 6 दिवस होम क्वारन्टाईन असतील.
अश्विनने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात 12 बळी घेतले. ब्रिस्बेनमधील निर्णायक लढतीत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात मात्र त्यानेही मोलाचा वाटा उचलला होता. सिडनीतील त्या सामन्यात अश्विनने विहारीसमवेत 62 धावांची झुंजार भागीदारी साकारत संस्मरणीय बरोबरी मिळवून दिली होती.
वॉशिंग्टनने गब्बा कसोटीतच पदार्पण केले आणि 62 धावांची झुंजार खेळी साकारली होती. त्याने पहिल्या डावात शार्दुल ठाकुरसमवेत 123 धावांची भागीदारी करत संघाच्या आव्हानात खऱया अर्थाने जान भरली. याशिवाय, त्याने गोलंदाजी करताना 4 बळीही घेतले. भारताने हा सामना 3 गडी राखून जिंकला होता. इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या 2 लढतीसाठी अश्विन व वॉशिंग्टन या दोघांचाही भारतीय संघात समावेश आहे. ही मालिका 5 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.