ऑनलाईन टीम / दावोसा :
केंद्रीय उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी पुन्हा एकदा ऍमेझॉनला लक्ष्य केले आहे. मागील काही वर्षात अमेझॉनने पुरवठय़ाच्या बाजूने रोजगार उपलब्ध केला. त्यामुळे किरकोळ व्यापार क्षेत्रातील लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, असे गोयल यांनी म्हटले आहे.
दावोसा येथे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले, ऍमेझॉनने येत्या पाच वर्षात दहा लाख नव्या नोकऱया देण्याची घोषणा केली. पण त्यांच्या या घोषणेपेक्षा त्यांच्या कंपनीमुळेच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. केवळ पुरवठय़ाच्या नोकऱया दिल्याने किरकोळ व्यापार मंदावला. ऍमेझॉनने सात लाख लोकांना रोजगार दिला. मात्र, त्यामुळे दहा लाख नोकऱयांवर कुऱहाड कोसळली. त्यामुळे ई कॉमर्स कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नियमांच्या अधीन राहून भारतात व्यवसाय करावा, असेही गोयल यांनी सांगितले.
ऍमेझॉनला देशातील व्यवसायात तोटा होत आहे. त्यामुळे ते भारतात 1 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. अशा प्रकारे गुंतवणूक करुन ते आपल्या देशावर उपकार करत नाहीत, असे गोयल यांनी यापूर्वी म्हटले होते.