वार्ताहर/ मडकई
सरकारने शैक्षणिक दृष्टय़ा सुरू केलेली ‘एकलव्य प्रशिक्षण योजना’ विद्यार्थ्यांना वरदान ठरण्यासाठी ती सर्वजाती समावेशक करावी. या योजनेला घातलेल्या निर्बंधामूळे इतर समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांच्या हितार्थ हे निर्बंध काढून टाकावे व खऱया अर्थाने शारदेचे पावित्र्य जपावे. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टय़ा समान न्याय द्यावा, अशी मागणी मगो पक्षाचे खजिनदार अनंत नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
सरकारच्या कुठल्याही योजनेतून कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊ नये. हे मगो पक्षाचे पूर्वीपासून ध्येय धोरण होते व आहे. गोव्याचे भाग्य विधाते व पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी याचसाठी दूर दृष्टीतून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. कुठलाही भेदभाव न करता भाऊसाहेबांनी प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळवून त्या विचारांना सरकारने या एकलव्याच्या योजनेतून सुरूंग लावू नये, असेही या परिषदेतून सांगितले. या योजनेचा व्यापक विचार करून ती सर्वजाती समावेशक करावी त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना या योजनेत स्थान द्यावे अशी मागणी मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे. एकलव्य ही योजना खरोखरच उत्कृष्ट असल्यामूळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मगो पक्षातर्फे अनंत नाईक यांनी अभिनंदन केले. या योजनेतील त्रुटी दूर केल्यास कुठल्याच विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. शिक्षण खाते हे मुख्यमंत्र्याकडे असल्यामूळे त्यांनी शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जपावे.
फोंडा येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, वेलिंग प्रियोळचे जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, मडकईच्या सरपंचा लक्ष्मी वळवईकर, पंच सदस्य विशांत नाईक आदी उपस्थित होते.
राजकारण व समाजकारणाला शिक्षण क्षेत्रात थारा देऊ नये. तसे केल्यास विद्यार्थी वर्गाचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल होईल. भाऊसाहेबांचे शैक्षणिक दृष्टय़ा असलेले विचार सार्थकी जाईल. आणि सक्षम अशी पिढी घडली जाईल. राज्य व देशाचे भविष्य असलेल्या या निरागस विद्यार्थी वर्गावर शिक्षणाद्वारे कुठलाच अन्याय होता कामा नये, ही मगो पक्षाची सरकारला कळकळीची विनंती असल्याचे अनंत नाईक व मगो कार्यकर्त्यांनी या परिषदेतून सांगितले.