आयसीसी टी-20 विश्वचषकात सलग दोन पराभवांमुळे भारतीय संघावर टीकेची झोड
दुबई / वृत्तसंस्था
झगडत असणारा कर्णधार, खराब फॉर्मकडे दुर्लक्ष करत लौकिकावर आधारित संघनिवड, बायो-बबलमुळे आलेला थकवा आदी अनेक बाबींचा भारतीय क्रिकेट संघाला यंदा चांगलाच फटका बसला असून एव्हाना संघ एक्झिटच्या दारात फेकला गेला आहे. पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ पराभव पत्करावे लागल्यानंतर भारताच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय, संघाची विश्वासार्हता देखील धोक्यात आली आहे.
पाकिस्तानविरुद्ध शाहिन आफ्रिदीचे पहिले 12 चेंडू खेळताना भारतीय आघाडीवीरांची उडालेली दाणादाण डोळय़ात अंजन घालणारी होती. पण, भारताने त्यातून काहीच धडा घेतला नसल्याचे न्यूझीलंडविरुद्ध लढतीत पुन्हा दिसून आले. आता उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर जर-तरची समीकरणे असून एका अर्थाने धोक्याची घंटा यापूर्वीच वाजली आहे. याच पार्श्वभूमीवर या पराभवाची नेमकी कारणे काय असावीत, याची वृत्तसंस्थेने केलेली कारणमीमांसा.
1) विराटचा नेतृत्वाच्या उत्तरार्धाकडील प्रवास
प्रत्येक कर्णधाराच्या नेतृत्व कारकिर्दीला मर्यादा असते आणि ही मर्यादा ज्या-त्या कर्णधारालाही जाणवते. सुनील गावसकर, महेंद्रसिंग धोनी यांना ती जाणीव होती. विराटला देखील टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी याची कल्पना आली आणि त्याने आपण विश्वचषकानंतर टी-20 नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली. मात्र, टी-20 विश्वचषक, वनडे विश्वचषक, चॅम्पियन्स चषक किंवा आयपीएल स्पर्धेत विराट सातत्याने अपयशी का ठरतो, हा कळीचा प्रश्न ठरत आला आहे.
निष्कर्ष- विराटचे टी-20 क्रिकेटमधील अपयश पाहता, वनडे क्रिकेटसाठीही नवा कर्णधार निवडला गेला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.
2) विसंवादाचे उत्तम उदाहरण-हार्दिक पंडय़ा
2019 मध्ये पाठदुखीवर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागल्यानंतर हार्दिक पंडय़ा एकदाही पूर्ण तंदुरुस्त असल्याचे दिसून आलेले नाही. अगदी तो गोलंदाजी करण्याइतपतही पूर्ण तंदुरुस्त नाही, याची जाणीव झाल्यानंतरही त्याला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळवण्याचा अट्टहास केला गेला आणि याचा संघाला चांगलाच फटका बसला. दोन्ही लढतीत सहाव्या गोलंदाजाची उणीव जाणवली, हे विराटने कबूल केले. या पार्श्वभूमीवर, वर्ल्डकपसाठी संघ निवडताना हार्दिक पंडय़ा तंदुरुस्त नाही, याकडे कोणी मुख्य दुर्लक्ष केले, हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. अक्षर पटेलला वगळत ऑल-राऊंड बॅकअप म्हणून शार्दुल ठाकुरला निवडण्यात आले. पण, प्रत्यक्ष विश्वचषकात हार्दिक पंडय़ा अपेक्षा पूर्ण करु शकला नाही, त्यावेळी बराच उशीर झाला होता.
हार्दिक पंडय़ाला पाकिस्तानविरुद्ध 11 चेंडूत 8 व न्यूझीलंडविरुद्ध 24 चेंडूत 23 धावा करता आल्या. सरतेशेवटी, न्यूझीलंडविरुद्ध त्याने 2 षटके टाकली. पण, त्यात नेहमीचा जोश अजिबात नव्हता.
निष्कर्ष ः विश्वचषकानंतर न्यूझीलंडविरुद्ध मायदेशी होणाऱया टी-20 मालिकेसाठी हार्दिक पंडय़ावर विश्वास ठेवला गेला नाही तर ते साहजिक असेल. ताज्या दमाचा वेंकटेश अय्यर एव्हाना संघाचे दरवाजे ठोठावत आला आहे.
3) निवडकर्ते या प्रश्नांची उत्तरे देणार का?
आयपीएलमुळे खेळाडू थकले होते, त्याचा वर्ल्डकपवर परिणाम झाला, असा मतप्रवाह असला तरी मुळात आयपीएलवरील कामगिरीच्या आधारावर संघनिवड झाली का, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल.
याचे कारण असे की, आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे संघनिवड केली गेली असती तर ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड व चतुरस्त्र मारा करणारा यजुवेंद्र चहल यांची निवड होणे भाग होते. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्याऐवजी, मागील 2 वर्षापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या, सूर हरवलेल्या भुवनेश्वर कुमारला निवडले गेले. आश्चर्य म्हणजे यंदाच्या आयपीएल मोसमात त्याच्या खात्यावर फक्त 6 बळी होते. निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा, त्यांचे सहकारी सुनील जोशी, हरविंदर सिंग, ऍबे कुरुविला, देबाशिष मोहंती यांच्याकडे याबाबत विचारणा होऊ शकते.
निष्कर्ष ः बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाह निवड समितीला पाचारण करु शकतात. तसेच, पुढील 2 वर्षातील पॅनेलची ब्ल्यू-प्रिंट काय असेल, याचीही फेरपडताळणी करु शकतात.
4) बायो-बबलचा मोठा फटका
आयपीएल दुसऱया टप्प्याचे नियोजन करताना मागील 4-6 महिन्यांपासून सातत्याने आपल्या सुटकेसेस घेऊन दौऱयावर असलेल्या खेळाडूंची बायो-बबलमध्ये काय स्थिती होत असेल, याचा अजिबात विचार झाला नाही. अर्थात, कित्येक कोटय़वधीचे व्यवहार पूर्ण करणे ही प्राथमिकता असल्याने बीसीसीआयसमोर कोणताच पर्याय नव्हता आणि त्यांना वर्ल्डकप उंबरठय़ावर असताना लगबगीने आयपीएलचा उर्वरित टप्पा आयोजित करणे भाग होते.
निष्कर्ष ः वर्ल्डकप संपल्यानंतर लगेचच दि. 25 नोव्हेंबरपासून भारत-न्यूझीलंड आमनेसामने भिडणार आहेत. त्यात कोहली, रोहित, राहुल, बुमराह, पंत व शमी यांच्यापैकी कोणी विश्रांतीची मागणी केली तर ते स्वाभाविक असेल.
5) भारताचे सर्व सामने सायंकाळच्या सत्रातच का?
वेळापत्रकावर बारीक नजर टाकली तर लक्षात येईल की, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या अन्य सर्व अव्वल संघांचा किमान एक तरी सामना दुपारच्या सत्रात झाला आहे. पण, ब्रॉडकास्टर्सचा इंटरेस्ट जपण्यासाठी भारताचे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता आयोजित केले गेले. भारताच्या पाकिस्तान व न्यूझीलंडविरुद्ध लढतीदरम्यानही चक्क एका आठवडय़ाचा कालावधी राखून ठेवला गेला आणि दोन्ही सामने रविवारीच आयोजित केले गेले. टीव्हीवरील चाहते व यामुळे टीव्हीवरील जाहिरातींचा निकष यावेळी समोर ठेवला गेला. पण, भारताच्या दुर्दैवाने सायंकाळच्या पहिल्या दोन्ही लढतीत विराट नाणेफेक हरला आणि डय़ू फॅक्टरची मोठी किंमत संघाला पराभवाच्या रुपाने मोजावी लागली.
निष्कर्ष ः अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले नाही तर उपांत्य फेरीत भारत दिसणार नाही आणि भारत बाद फेरीत असेल तरच हमखास उत्पन्न, हे गणित समोर ठेवणाऱया आयोजकांसाठी ही बाब विशेष चिंतेची असेल.
दिग्गजांचे मत काय आहे?
भारतासाठी हा अतिशय निराशाजनक निकाल आहे. भारतीय खेळाडूंची देहबोली अगदीच निराशाजनक होती. खराब फटक्यांची निवड फटका देणारी ठरली. यावर भारताला सखोल आत्मचिंतन करावे लागेल.
-विरेंद्र सेहवाग
आयसीसीच्या बडय़ा स्पर्धांमध्ये केवळ एका सामन्यातील कामगिरीवरुन अंतिम एकादशमध्ये बदल करणे योग्य ठरत नाही. खेळाडूंसाठी स्थैर्य महत्त्वाचे असते. न्यूझीलंडचा खेळ मात्र उत्तम होता.
-इरफान पठाण
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम मारा केला. पण, भारतीय फलंदाजांनी हाराकिरी करत त्यांचे काम सोपे केले. हा पराभव प्रदीर्घ काळ सलणारा असेल. आता सेमीफायनल गाठणे निव्वळ स्वप्नवत झाले आहे.
-व्हीव्हीएस लक्ष्मण
रोहित शर्मा दिग्गज फलंदाज आहे. तरीही त्याला तिसऱया स्थानी पाठवले गेले. विराट चौथ्या स्थानी आला. इशानला सलामीऐवजी चौथ्या किंवा पाचव्या स्थानी पाठवणे योग्य ठरले असते. सर्व बदल धक्कादायक होते.
-सुनील गावसकर
मागील दोन्ही लढतीत भारताच्या धावा झाल्या नाहीत आणि ज्यावेळी धावा होत नाहीत, त्यावेळी चमत्काराची अपेक्षा करणे निव्वळ चुकीचे ठरते. चमत्कार घडला तरच 111 सारख्या माफक धावसंख्येचे संरक्षण करणे शक्य होते.
-मदनलाल
पराभूत व्हावे लागल्यानंतर, अपयशी पदरी आल्यानंतर त्याचा सर्वाधिक त्रास खेळाडूंनाच होतो. त्यामुळे, आपण खेळाडूंना टीकेचे लक्ष्य करणे थांबवायला हवे. न्यूझीलंडचा संघ सरस ठरला, हे मान्य करणे भाग आहे.
-हरभजन सिंग
भारताने आपल्या खेळाडूंना किमान यापुढे तरी बाहेरील देशात अन्य लीग स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पाठवायला हवे. भारतीय क्रिकेटमध्ये बरीच गुणवत्ता आहे. पण, यासाठी त्यांना योग्य तेथे संधी मिळणे आवश्यक आहे.
-मायकल वॉन
भारतीय संघ आताही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरु शकतो. पण, यासाठी केवळ चमत्कार होणे गरजेचे आहे. अर्थात, मागील दोन सामने भारताने ज्या पद्धतीने खेळले, ते पाहता त्यांना एखादा चमत्कारच आता उपांत्य फेरीत पोहोचवू शकेल.
-शाहिद आफ्रिदी
भारताचा खेळ अगदीच खराब स्वरुपाचा होता. त्यांच्यावर बरेच दडपण असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. भारताचा गेमप्लॅन काय होता, रणनीती काय होती, याबद्दल काहीच स्पष्ट नव्हते. भारताने हरणारा संघ खेळवला आणि तो संघ हरला, इतकाच निष्कर्ष यातून निघतो.
-शोएब अख्तर
विराट कोहलीचे आणि अश्विनचे नेमके काय वैर आहे, हे मला अद्याप समजलेले नाही. अश्विनसारख्या दिग्गज खेळाडूला संघाबाहेर ठेवण्यात काय हशील आहे? कर्णधारांना खरीच इतकी मोकळीक देणे आवश्यक आहे का?
-निक कॉम्प्टन
बुमराह स्पष्टपणे म्हणाला, आम्हाला ब्रेक हवा आहे!
‘बायो-बबल ही कटू वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकारणे भाग आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण, सातत्याने या बायो-बबलमध्ये राहणे अतिशय कठीण असते. आम्ही बायो-बबलशी जुळवून घेण्यासाठी अविरत कार्यरत राहत आलो आहोत. पण, याचे तोटे आणि विपरित परिणामही लक्षात घ्यायला हवेत. खेळाडूंना ब्रेकची नितांत गरज आहे’, हे शब्द आहेत भारताचा आघाडीचा स्पीडस्टार जसप्रित बुमराह याचे!
‘काही काही वेळा आम्ही 6-6 महिने कुटुंबापासून दूर असतो. या सर्व बाबींवर आमचे नियंत्रण असू शकत नाही. पण, मैदानावर असताना आमचा पूर्ण फोकस खेळावर असतो. त्यावेळी आम्ही इतर बाबींचा विचार करत नाही. तरी प्रदीर्घकाळ कुटुंबापासून दूर, बबलमध्ये राहणे कठीण परीक्षा घेणारे असते. मात्र, खेळाडू कम्पर्ट झोनमध्ये असावेत, यासाठी बीसीसीआय बरेच प्रयत्न करत आले आहे’, असे बुमराह पुढे म्हणाला.
भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी जूनमध्ये इंग्लिश भूमीत उतरला, त्या वेळेपासूनच बबलमध्ये आहे. मध्यंतरी त्यांना केवळ 3 आठवडय़ांचा ब्रेक देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर, बुमराहने यावर टाकलेला प्रकाशझोत विशेष महत्त्वाचा आहे.
बॉक्स
खेळाडू रोबोट नव्हेत, त्यांच्या पाठीशी उभे रहा ः पीटरसन
भारतीय खेळाडूंवर एका बाजूने प्रचंड टीका होत असताना दुसरीकडे, माजी इंग्लिश फलंदाज केव्हिन पीटरसनने मात्र या खेळाडूंना पाठबळ दर्शवले. ‘खेळाडू हे काही रोबोट नव्हेत. कठीण कालखंडात आपण त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे’, असे तो म्हणाला.
खेळात एक संघ जिंकतो, एक संघ हरतो. पण, कोणतेच खेळाडू हरण्यासाठी मैदानात उतरत नसतात. देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वोच्च सन्मान असतो. खेळाडूंच्या भावनाही जाणून घ्या, याचा त्याने पुढे उल्लेख केला. पीटरसनने 104 कसोटी व 136 वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.