वृत्तसंस्था/ मुंबई
नवा कर्णधार रिषभ पंतसह संघातील बहुतेक खेळाडू चांगल्या लयीत असल्याने दिल्ली कॅपिटल्स संघ जेतेपदापर्यंत धडक मारण्यास सक्षम असल्याचे मत या संघाचे साहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागल्याने त्यांचे जेतेपदाच स्वप्न उद्ध्वस्त झाले होते.
‘आम्हाला यावेळी आणखी एक पाऊल पुढे टाकायचे असून हेच दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य ध्येय आहे. आपल्या संघात जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याची निश्चितच क्षमता आहे,’ असे कैफ म्हणाले. येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर झालेल्या संघाच्या पहिल्या सरावानंतर ते बोलत होते. ‘गेल्या वर्षी स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचलो होतो. पण ते साध्य होऊ शकले नव्हते. पण यावेळी पंतसह अनेक खेळाडू पूर्ण बहरात असल्याने जेतेपद मिळविण्याची खात्री वाटू लागली आहे. गेल्या काही कालावधीपासून ते बऱयापैकी क्रिकेट खेळत असून त्यांना चांगला सराव झाला आहे. याशिवाय त्यांना लयही सापडली आहे,’ असेही ते म्हणाले.
या संघात आर.अश्विन, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, इशांत शर्मा, तसेच स्टीव्ह स्मिथ, कागिसो रबाडा, ऍन्रिच नॉर्त्जे यासारखे विदेशी खेळाडू असून गेल्या काही महिन्यांपासून ते क्रिकेट खेळत आहेत. सरावावेळी प्रकाशझोतात झेल पकडण्याचा सराव करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘गेल्या काही दिवसांपासून ते फलंदाजी व गोलंदाजीचा सराव करीत आहेत. त्यामुळे या सत्रावेळी क्षेत्ररक्षणावर भर देण्याचा निर्णय घेतला होता. झेलांच्या सरावावेळी काही नवीन युवा खेळाडूंना तसेच अनुभवी खेळाडूंनाही भेटण्याची संधी मिळाली,’ असेही त्यांनी सांगितले. दिल्ली कॅपिटल्सची पहिली लढत 10 एप्रिल रोजी मुंबई चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध होणार आहे.