वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगावचे माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती आणि सहकारमंत्री टी. सोमेश्वर यांची नुकतीच बेंगळूर मुक्कामी भेट घेण्यात आली. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रगतीसाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये आमदार लक्ष्मीबाई हेब्बाळकर, चेअरमन युवराज कदम, माजी चेअरमन निंगाप्पा जाधव, माजी उपाध्यक्ष सुधीर गड्डे, सचिव डॉ. कोडीगौडा, सदस्य लगमाण्णा नाईक, बाजार समिती सुपरिटेंडंट एम. पी. पाटील यांचा समावेश होता.
मंत्रीमहोदयांनी यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती चेअरमन युवराज कदम यांनी दिली.
या निवेदनामध्ये भाजी मार्केटमधील भाजी शेतकरी बांधवांसाठी भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली असल्यास त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शीतगृह बांधकामासाठी 5 लाख रुपये, शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती करण्यासाठी शेतीविषयक माहितीची बाजार समिती आवारात सोय करणे, बाजार समितीमधील रयत भवन आणि विश्रामगृह दुरुस्ती, बाजार समिती आवारात मुबलक प्रमाणात पाण्याची सोय, शुद्ध पाण्याचे दोन प्रकल्प, एक भाजी मार्केटमध्ये, दुसरे कांदा-बटाटा मार्केटमध्ये, भाजी व्यापारी बांधवांसाठी डी ब्लॉकमध्ये 18 तर सी ब्लॉकमध्ये व्यापारीवर्गासाठी कार्यालयीन कामासाठी गाळय़ांची निर्मिती, यासाठी निधी मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. शिवाय भाजी व्यापारी बांधवांसाठी नव्याने डी ब्लॉकमध्ये 45 दुकानांसाठी कामाची मंजुरी द्यावी. तसेच नाबार्ड योजनेमधून केंद्र शासनातर्फे बाजार समिती आवारातील रस्ते, गटारींसाठी मंजूर झालेला 15 कोटी रुपयांचा निधी बाजार समितीच्या नावे जमा करावा. आतापर्यंत बाजार समितीच्या विकास फंडातून हा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामधूनच भाजी मार्केट उभारण्यासाठी कर्ज घेण्यात आले होते. त्यांची सुद्धा परतफेड करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन आनंद पाटील यांनी दिली.