मनसे एसटी कामगार संघटनेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप
मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज दिले नाहीत
.. तर प्रशासनावर ठपका ठेवणार!
प्रतिनिधी / कुडाळ:
एस. टी. प्रशासनाने जिल्हय़ांतर्गत बसफेऱया सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही बसफेऱया सुरू झाल्या. मात्र, एस. टी. ने वाहक-चालक यांच्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज दिले नाहीत, असा आरोप मनसे एसटी कामगार संघटनेचे बनी नाडकर्णी यांनी करून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱयांच्या जीवितास धोका उद्भवल्यास प्रशासनावर ठपका ठेवून गुन्हा दाखल करणार, असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे, ‘कोविड-19’च्या पार्श्वभूमीवर एस. टी. प्रशासनाने जिल्हय़ांतर्गत लोकांच्या हितासाठी बसेस सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो कितीही चांगला असला, तरी यामध्ये कर्मचाऱयांचे हाल होऊ नये. त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, याची कुठलीही काळजी घेतलेली नाही.
आजतागायत एस. टी. कर्मचाऱयांचे पगारही झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे हाल सुरू आहेत. ‘अत्यावश्यक सेवा’, या नावाखाली कर्मचाऱयांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. तोटय़ात चाललेल्या एस. टी. प्रशासनाला ‘कोविड-19’ मुळे दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करून एस. टी. चालविणे म्हणजे महामंडळाला अधिकच तोटय़ात टाकरणारे आहे.
असे असताना कर्मचाऱयांना सुविधा न देता अत्यावश्यक सेवा देणारी एस. टी. आजपर्यंत लोकांच्या सेवेसाठी कधीही तत्पर होते व आहे. पण, आज सरकारने सेवेकडे व सेवा देणाऱया कर्मचाऱयांना ज्या-ज्या सुविधा दिल्या गेल्या त्या सर्व या एस. टी. कर्मचाऱयांना मिळाल्याच पाहिजेत. एस. टी. कर्मचारी जगो किंवा मरो याचे सरकारला काडीमात्रही सोयरसुतक नाही.
एकही खासदार, आमदार किंवा पालकमंत्र्यांनी एस. टी. कर्मचाऱयांच्या घरी जाऊन साधी विचारपूसही केली नाही किंवा यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला नाही, ही फार खेदाची गोष्ट आहे.
एस. टी. कर्मचाऱयांच्या जीवाला कुठल्याही प्रकारची इजा या महामारीच्या कठीण परिस्थितीमध्ये न होण्याची जबारदारी घ्यावी. असे न केल्यास कुठल्याही कर्मचाऱयाला प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजार किंवा मृत्यू झाल्यास त्या-त्या आगाराच्या एस. टी. प्रशासनावर ठपका ठेवून मनसे संबंधित अधिकाऱयांवर मनुष्यवधाचा दावा दाखल करणार व प्रशासनाला त्या कर्मचाऱयाच्या कुटुंबियांना किमान एक करोड रु. तरी देण्यास भाग पाडणार असल्याचे नाडकर्णी यांनी या पत्रकात म्हटले आहे.