नागरिक हैराण : कामे पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
स्माट सिटी योजनेतील विविध रस्त्याचे काम अंतिम टप्यात सुरू आहे. काही रस्त्याचे काम अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एसपीएम रोडवरील रस्त्याचे काम अर्धवट असतानाच आता याठिकाणी ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. येथील घालण्यात आलेले पेव्हर्स हटविण्यात आल्याने रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एसपीएम रोडचे काम तीन वर्षानंतरही पूर्ण झाले नाही. कोणती ना कोणती कामे शिल्लक असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपूल ते शिवाजी उद्यानापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटिकरण करण्यात आले आहे. पण सदर रस्त्याच्या काँक्रिटिकरणाचे काम व्यवस्थित झाले नाही. अशातच रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर्स घालण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलानजीक रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अडचणीचे बनले होते. त्यामुळे याठिकाणी काही भागाचे पेव्हर्स घालून रस्ता व्यवस्थित करण्यात आला होता. पण काही ठिकाणी डेनेज वाहिन्यांची समस्या निर्माण झाल्याने रस्ता खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. एसपीएम रोडशेजारी डेनेज वाहिन्या घालण्यात येत आहेत. पण येथील घालण्यात आलेले पेव्हर्सही काढले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. शहर व उपनगरात खोदाईमुळे नागरिक त्रस्त झाले असून रस्ता खोदाईचे सत्र कधी संपणार, असा मुद्दा उपस्थित होत आहे. खोदलेल्या ठिकाणी डेनेजवाहिन्या घालून रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.