प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात अडकलेल्या नागरिकांना मोफत एस.टी. सेवा द्या, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारी रात्री जाहीर केले होते. मात्र लगेचच हा निर्णय मागे घेताना केवळ मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा असेल, असा निर्णय परिवहन मंत्री परब यांनी घेतला आहे. मात्र अद्यापही असे कोणतेही परिपत्रक आपल्याला प्राप्त झाले नसून प्राप्त होताच याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली. तसेच रत्नागिरी जिल्हय़ातून रविवारी मजूर अथवा नागरिकांना घेवून एकही बस सुटली नाही.
परिवहन मंत्र्यांना रातोरात मोफत बससेवेचा निर्णय बदलावा लागला आहे. यामध्ये बदल करताना केवळ अडचणीत सापडलेल्या मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांना ही सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. अद्यापही असे कोणतेही परिपत्रक एस. टी. विभागाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे परिपत्रक आल्याशिवाय एस. टी. प्रशासन कोणतेही निर्णय घेणार नसल्याचे सांगण्यात आले.
सुनील भोकरे- विभाग नियंत्रक रत्नागिरी
रविवारी मंडणगडमध्ये मुंबईतून 21 प्रवासी घेवून बस आल्याची माहिती आम्हाला बाहेरून कळली मुळात कोणतीही महामंडळाची बस जिल्हय़ात येणार असेल किंवा बाहेर जाणार असेल तर त्याची नोंद विभागाकडे असते मात्र मंडणगड मध्ये आलेल्या एसटी बाबत अद्यापही विभागाला काहीच कल्पना नाही याची सविस्तर माहिती घेण्यात येईल.