प्रतिनिधी / सरवडे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निडणूकीत सेवा संस्था गटातील सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने राधानगरी तालुक्यातून ए. वाय.पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीचे वृत कळताच राधानगरी तालुक्यात त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.
राधानगरी तालुक्यातून सेवा संस्था गटातून ए वाय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
त्यांच्या विरोधात असणार्या काँग्रेस,जनता दल व मित्र पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळे पाटील यांचा यशाचा मार्ग सुकर झाला होता. परंतू शिवसेनेच्या अशोक फराकटे, शामराव भावके व रमेशराव वारके यांनी अर्ज दाखल केले होते. आज या तीनही उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पाटील यांची बँकेच्या संचालक पदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.
बिनविरोध निवडीनंतर पाटील यांचा जिल्ह्यातील विविध नेत्यांनी भेटून अभिनंदन केले तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. कोल्हापूर ते सोळांकूर मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. विविध गावांत पाटील यांचे स्वागत करून कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. या बिनविरोध निवडीने पाटील यांचे राजकीय स्थान अधिक भक्कम झाले असून कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त होत आहे.