गणेशभक्तांमधून नाराजीचा सूर
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या भक्तीपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. परंतु शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने या उत्साहावर विरजण पडत आहे. एकतर यावषी कोरोनामुळे अनेक निर्बंध आले असताना दुसरीकडे विजेच्या खेळखंडोब्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दोन-तीन तास वीजपुरवठा बंद असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयात 11 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात सुरळीत वीजपुरवठा करण्याची आश्वासने हेस्कामकडून दिली जात असतात. परंतु दुरुस्तीचे नाव पुढे करत या ना त्या कारणाने विजेचा लपंडाव सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातही वीजपुरवठा नसल्यामुळे त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. आधीच कोरोनामुळे मागील चार महिने व्यापार नाही. त्यात आता ऐन गणेशोत्सवात वीज काढली जात असल्यामुळे व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत.
टिळकवाडी, शहापूर, अनगोळ या परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्यामुळे अनेकवेळा वीजपुरवठा बंद केला जात आहे. बऱयाच वेळा पूर्वसूचना न देता तासन्तास वीजपुरवठा ठप्प केला जात असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे निदान गणेशोत्सवाच्या काळात तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.