प्रतिनिधी/ बेळगाव
मागील नऊ दिवसांपासून मनोभावे पूजा केलेल्या गणरायाला रविवारी भक्तीपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावषी वाजतगाजत नसेल तरी भक्तीपूर्ण वातावरणात श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. दुपारनंतर विसर्जन तलावांवर गणेशभक्त दाखल होत होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. यावेळी गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
शहरातील जक्कीनहेंड, कपिलेश्वर तलाव, अनगोळ, जुने बेळगाव, मजगाव, किल्ला, कणबर्गी या विसर्जन तलावांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. महानगरपालिकेने सर्व ठिकाणी व्यवस्था केली होती. निर्माल्य जमा करण्यासाठी कलशदेखील उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, नागरिकांना सूचना करूनही निर्माल्य विसर्जन तलावांमध्येच टाकण्याचे प्रकार वारंवार घडत होते.
सार्वजनिक गणेशमूर्तींचेही विसर्जन
अनंत चतुर्दशीदिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी बऱयाच मंडळांनी यावषी लवकर विसर्जन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार रविवारी बऱयाच गणेश उत्सव मंडळांनी विसर्जन केले. हिंदवाडी येथील गोमटेश विद्यापीठामागील मंडळाने रविवारी विसर्जन केले. त्याच बरोबर इतर लहान मंडळांनीही गणेशमूर्तींचे विसर्जन केले. बऱयाच कुटुबांनीही घरगुती श्रीमूर्तींचे रविवारीच विसर्जन केले.
मंगळवारी विसर्जन करण्यास कोणताच अडथळा नाही
यावषी अनंतचतुर्दशी मंगळवारी आल्यामुळे गणेशभक्तांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मंगळवार हा गणपतीचा वार असल्यामुळे त्या दिवशी गणरायाचे विसर्जन कसे करायचे, असा प्रश्न निर्माण होत होता. परंतु मंगळवार व गणेशमूर्तीचे विसर्जन यामध्ये कोणताही अडथळा नाही. काही वर्षांपूर्वीही विसर्जन मंगळवारी आले होते. नागरिकांनी कोणताही संभ्रम निर्माण करून न घेता मंगळवारी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन चित्तरंजन जोशी यांनी केले आहे.