वारणानगर / प्रतिनिधी
वाडी रत्नगिरी ता. पन्हाळा जोतिबा डोंगरावरती पुजनासाठी आणलेला ट्रॅक्टरखाली सापडून युवकाचा जागीच मृत्यू झाला.सुजय गणपतराव चव्हाण (वय १७) रा.खटाव (ता. पलूस जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. सोमवारी दि. १ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या . या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.
या बाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की साखर कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने कोडोली परिसरात ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत. चव्हाण कुंटूबीय हंगामातील ऊस वाहतूक करण्यासाठी आले होते कामाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रथेप्रमाणे श्री जोतिबा देवाच्या दारी येवून वाहनाचे पूजन करून आपल्या ऊस वहातुकीच्या कामाला प्रारंभ करतात, आज सुजय हा आपले चुलते विनायक चव्हाण, सुभाष चव्हाण यांच्याबरोबर पुजनासाठी ट्रॅक्टर जोतिबा डोंगरावरती घेवून आला होता. पुजन सुरू असतांना ट्रॅक्टरच्या मागील चाकासमोर उभा राहून सुजय चव्हाण यांने ट्रॅक्टर स्वत: सुरू केला. ट्रॅक्टरखाली सुजय सापडल्याने त्याच्या अंगावरुन ट्रॅक्टरचे मागील चाक गेल्याने सुजय गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी कोल्हापुर येथील सी.पी.आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरानी जाहिर केले.या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे पुढील तपास हावलदार उदय काटकर करीत आहेत.
कुंटूबात एकुलता एक असलेल्या सुजयचा दुपारी अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त खटावमध्ये पोहचले अपघात कोल्हापुर जिल्ह्यात जोतिबा येथे झाल्याने दिवसभर गावात ग्रामस्थात काळजीचा ठोका वाढला होता. सुजय वर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे दिवसभर देव पाण्यात घालुन ग्रामस्थ बसले होते. रात्री उशिरा सुजयची प्राणज्योत मालवल्याची बातमी कळाली आणी गावाच्या काळजाचा ठोका चुकला या घटनेने सर्वत्र गावात सन्नाटा पसरला आहे.आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला सुजय हा तासगावात इ.१२ वी चे शिक्षण घेत होता त्याला एक बहिण आहे तर वडील शेती करतात दिपावलीच्या तोंडावरच वंशाचा दिवा हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.