बेळगाव / प्रतिनिधी :
बेळगाव राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी एक अनोखी राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन काव्यलेखन व सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात प्रथम क्रमांक स्नीता लंबोर (बी.ए.तृतीय- एम.एम.कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खानापूर) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख तथा स्पर्धेच्या संयोजक प्रा.डॉ.शोभा नाईक आणि सहकाऱ्यांच्या कल्पनेतून आयोजिलेल्या या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रणाली सुर्लकर, (एम.ए.-गोवा विद्यापीठ, गोवा), तृतीय क्रमांक-गौरी रत्नपारखी (वाणिज्य-हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय सोलापूर) यांनी पटकाला. तर उत्तेजनार्थ पारितोषिके आलिशा गाड, गोवा विद्यापीठ, अपूर्वा सांब्रेकर, गोवा विद्यापीठ, स्नेहा तिप्पाणाचे (बी.ए.तृतीय-आरपीडी महाविद्यालय, बेळगाव), छयन गांवकर ( सेंट झेविअर कॉलेज, म्हापसा, गोवा), सानिया मुल्ला (व्यंकटराव जुनिअर कॉलेज, इचलकरंजी) यांनी प्राप्त केली.
लॉकडाऊन घोषित झाले आणि आपण त्यातून जाताना अनेक चित्रविचित्र गोष्टी अनुभवू लागलो. प्रचंड उर्जा आपल्यात बाळगवणारा विद्यार्थी वर्ग असहाय होऊन चार भिंतींमध्ये कोंडून पडला. एकूणच सर्व सार्वजनिक व्यवहार ठप्प झाल्यावर रस्ते शांत होऊन गेले. बातम्यांतून जे कानावर पडू लागले, डोळ्यांना दिसू लागले ते पाहून संवेदनशील मनात काहूर माजू लागले. मानवाला रोख बसवू पाहात असलेली ही ‘आपत्ती’ वास्तविक साहित्याच्या विविध माध्यमांतून हळूहळू प्रकट होईलच. पण अशा कोसळलेल्या विदारक परिस्थितीवरील पहिला उद्गार व्यक्त होईल तो कवितेतूनच. हे लक्षात घेऊन सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमध्ये वास्तवाचे अवलोकन, आकलन आणि त्याचा आविष्कार ही कौशल्ये आकारास आणण्याच्या दृष्टीतून सहायक अशी स्वरचित काव्य वाचनाची ही स्पर्धा संपन्न झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून सदर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी सध्या जगभर हाहाकार माजविलेल्या रोगराईचे वास्तव कसे लक्षात घेतले आहे, मानवता म्हणजे काय आणि प्रगती म्हणजे काय या संदर्भातून त्यांनी कसा विचार केला आहे, याचे दर्शन त्यांनी पाठविलेल्या कवितांमधून घडले. कवितांच्या नावाखाली निर्माण होणारे अनाठायी रंजनवादी पीक याही परिस्थितीत फोफावलेले असताना विद्यार्थी स्पर्धकांनी मात्र वास्तवाचे भान देणाऱया कविता लिहिल्या या बाबत स्पर्धेच्या आयोजक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शोभा नाईक यांनी समाधन व्यक्त केले आहे.
स्पर्धकांनी पाठविलेल्या काव्य वाचनाच्या चित्रफितीचे परीक्षण केले गेले. मराठी व जागतिक साहित्याचे अभ्यासक व विवेचक अनिल आजगावकर व पुणे येथील रंगकर्मी पुण डॉ. अनिरुद्ध ठुसे यांनी काव्य स्पर्धेचे परीक्षण केले.यशस्वी स्पर्धकांना तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना इमेलच्या द्वारे इ-प्रमाणपत्रे पाठविण्यात येतील. स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाने तसेच प्राचार्य व इतर प्राध्यापकांनी सहकार्य केले.यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांचे बेळगाव येथील प्रख्यात शिक्षण संस्था एसकेई व राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातर्फे तसेच मराठी विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.