झी युवा वरच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय. सध्या मालिकेत प्रेक्षक लगीनघाई पाहत आहेत पण हे लग्न नचिकेत आणि सईच नसून अप्पा आणि आजींचं आहे. अप्पा आणि आजींच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा अप्पा आणि आजींच्या लग्नाचा नचिकेतने घाट घातला आहे. त्यामुळे आता मालिकेत प्रेक्षकांना लग्नाच्या सर्व विधी, रीती आणि कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
परंपरेनुसार लग्नाआधी नवऱयामुलाने नवरीला पाहायचे नसते म्हणून आजी लग्नाच्या आदल्या दिवशी माहेरपणाला नचिकेतच्या घरी राहायला जाणार आहेत. तिथेच आजींची हळद, मेहंदी पार पडणार आहे. त्यानंतर अप्पा आणि आजींचा पारंपरिक विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सगळ्यात सई आणि नचिकेतच नातं देखील अजून खुलताना प्रेक्षकांना पाहू शकतील कारण सई पहिल्यांदा नचिकेतवरच्या तिच्या प्रेमाची कबुली आय लव्ह यु म्हणून देणार आहे. आता ती नचिकेतला कशा प्रकारे आय लव्ह यु म्हणणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी युवावर प्रसारित होते.