प्रतिनिधी / ओटवणे:
ओटवणे-कापईवाडी परिसरात उन्हाळी पिकांसह बागायतीमध्ये गव्यारेडय़ांच्या कळपांचा उच्छाद सुरूच असून शेतकऱयांसह बागायतदार पुरते हैराण झालेले आहेत. गव्यांचे हे कळप दररोज भरदिवसा व रात्रीच्यावेळी शेती-बागायतींचे हजारो रुपयांचे नुकसान करीत आहे.
ओटवणे-कापईवाडी परिसर पुन्हा एकदा गव्यांच्या दहशतीमुळे भयभीत असून दररोज गवे शेतीöबागायती तसेच वस्तीत घुसून दहशत माजवत आहेत. गव्यांचे हे कळप कोणत्याही उपाययोजनांना भीक न घालत नसल्याने त्यांच्या मुक्तसंचारामुळे शेतकऱयांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून गव्यांचा हा कळप ओटवणे-कापईवाडीतील संगिता उपरकर, रुपाली पानगळे, बापू कोठावळे, रमेश वरेकर, रवींद्र कुडाळकर, गंगाराम कोठावळे, अंकुश नाईक आदी शेतकऱयांच्या शेती-बागायतीमधील चवळी, मका, मिरची, वाल व काजू, पोफळी, नारळ बागायती पिकांची नुकसानी करीत आहे.
गव्यांचे कळप हे रात्रंदिवस दहशत माजवित असून वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या गव्यांपासून होणारे नुकसान सोडा, पण जीवितास धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. कारण 13 वर्षापूर्वी 2008 मध्ये कापईवाडीत हत्तीच्या हल्ल्यात केशव उपरकर यांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या गव्यारेडय़ांच्या या मुक्तसंचाराबाबत वनखात्याने कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान, या भागातील लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन शेतकरी व बागायतदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.