पदे भरण्याची आजी-माजी सैनिक संघटनेची मागणी
औंध /प्रतिनिधी
औंध येथील भारतीय स्टेट बँकेत सध्या कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने ग्राहकांची गैरसोय होत असून बँकेने तातडीने पदे भरावीत अशी मागणी आजी माजी सैनिक संघटनेने केली आहे.संघटनेने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औंध येथे जुन्या काळापासून भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. परीसरातील पारगांव, कळंबी, वडी, त्रिमली, लांडेवाडी, येळीव, खरशिंगे, गोपूज, वरुड, औंध, खबालवाडी, नांदोशी, गोसाव्याचीवाडी आदी गावातील आर्थिक व्यवहार बँकेशी निगडित आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन देखील याच काळात ठिकाणी होते त्यामुळे परीसरातील ग्राहकांचा नित्याचा संबंध बँकेशी येत असतो.
पिक कर्ज, शेतीविषयक कर्ज, शैक्षणिक कर्ज नोकरदार लोकांसाठी वाहन कर्ज आदी तसेच दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहक बँकेत येत असतात. मात्र सध्या बँकेत शाखाधिकारी आणि कँशियर अशी दोनच पदे कार्यरत आहेत. पदे रिक्त असल्याने बँकेत खाते काढणे, पैशाचा भरणा करणे, पिक कर्ज काढणे, हयातीचे दाखले जमा करणे या कामासाठी तिष्ठत बसावे लागत आहे. काम वेळेत होत नसल्याने बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे वारंवार खटके उडत आहेत. तर अपुरा स्टाफ असल्याने बँकेतील अधिकारी ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला ग्राहकांना देत आहेत. बँक असताना ग्राहक सेवा केद्रात आर्थिक भुर्दंड ग्राहकांनी कशासाठी सोसायचा असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे. बँक प्रशासनाने मागणीची तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरावीत अन्यथा आम्हाला टाळे ठोकावे लागतील असा इशारा सैनिक संघटनेने दिला आहे.
“ब्रीद वाक्याप्रमाणे सेवा द्यावी”
बँकेत दोनच कर्मचारी असल्याने लोकांचे आर्थिक व्यवहार वेळेवर होत नाहीत त्यामुळे ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांची कामे खोळंबली आहेत. सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून बिरुदावली लावणाऱ्या बँकेने लोकांना तत्पर सेवा द्यावी.
- धनाजी आमले मेजर , सचिव आजी माजी सैनिक संघटना