भाजपच्या दहा वर्षांच्या काळात सर्वांगीण विकास झाल्याचा दावा
पणजी : काँग्रेस पक्षाचे उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार खोटा प्रचार करीत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात दिवसेंदिवस घोटाळे घडत होते आणि त्यामुळेच त्यांना जनतेने नाकारले. तरीही खोटा प्रचार करण्याचे सोडून देऊन राष्ट्रीय मुद्यांवर बोलण्याचे धाडस करावे. कारण भाजपने गेल्या दहा वर्षांत अनेक कल्याणकारी योजना राबविण्याबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास साधला आहे. या विकासाच्या आधारेच भाजपचे गोव्यातील दोन्ही उमेदवार निर्विवादपणे वर्चस्व राखतील, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते गिरीराज वेर्णेकर यांनी केला आहे. भाजपच्या कार्यालयात काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यतीश नाईक, समीर मांद्रेकर, दीक्षा कानोळकर उपस्थित होत्या. वेर्णेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गोव्यात अनेक कल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास आले. त्यापैकी म्हणजे अटल सेतू, मोपा विमानतळ, धारगळ येथील आयुष इस्पितळ, महामार्गांचे जाळे विणले. याशिवाय इतर 15 राज्यांत मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली. ही सर्व विकासकामे भाजपने जनतेच्या हितासाठी केली. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात केवळ जनतेचा पैसा लाटण्यातच धन्यता मानली. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातील जनतेला खोटी माहिती देण्यापेक्षा राष्ट्रीय मुद्यांवर बोलावे, असेही ते म्हणाले.
लोकांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा
यतीश नाईक म्हणाले, काँग्रेसने जनतेसमोर ठेवलेला जाहीरनामा हा निव्वळ पोकळ आश्वासनांचाच आहे. कारण काँग्रेसकडे कोणत्याही प्रकारचा आश्वासक असा कार्यक्रमच नाही. तरीही ते राज्यातील जनतेला फसवू पाहत आहेत. राज्यातील जनतेच्या कष्टांच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे, हे त्यांच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट होत आहे. राज्यातील जनता सूज्ञ असल्याने काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला आणि फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. नरेंद्र मोदी यांनी संबंध राष्ट्राचा विकास पूर्ण गतिने आणि क्षमतेने साधला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात देशात केवळ 16 हजार कि. मी. रस्त्यांची कामे झालीत. परंतु नरेंद्री मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात गेल्या दहा वर्षांत 95 हजार कि. मी. रस्त्यांचे जाळे विणले गेले. ग्रामीण भागातील रस्ते यांचीही स्थिती सुधारली. ग्रामीण भागातही दळण-वळणाच्या सुविधा पुरविण्यासाठी भाजपचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे विकासकामांविषयी निश्चित कार्यक्रम असल्यास काँग्रेसने तसा प्रचार करावा, असेही ते म्हणाले.
काँग्रेस जाहीरनाम्यात थायलँड, न्यूयॉर्क
काँग्रेसने जनतेसमोर ठेवलेला जाहीरनामा हा केवळ फसवा आहे. या जाहीरनाम्यात कोणत्याही प्रकारची गंभीरता नाही. काँग्रेसने जनतेची दिशाभूल करून थायलँड आणि न्यूयॉर्क येथील फोटो प्रसिद्ध केले आहेत. ते देशातील स्थितीची चुकीची माहिती जनतेला देत आहेत. काँग्रेसकडे जनतेच्या विकासासंबंधी कोणताही कार्यक्रम नसल्याने त्यांनी पोकळ जाहीरनामा प्रसिद्ध केला, असा आरोप यतीश नाईक यांनी केला.