ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबादच्या दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडी रॅक रूळावरून घसरल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. त्यामुळे नांदेड-मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाडय़ांची वाहतूक ठप्प झाली आहे. दुपारी एक वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली. या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मालवाहतूक रेल्वे रुळावरुन हटवून वाहतूक सुरळित करण्यासाठी ब्रेक डाऊन व्हॅन मागवण्यात आलेली आहे. सध्या नांदेड-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रोटेगाव काचीगुडा पॅसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर, जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर, निजामाबाद पुणे पॅसेंजर औरंगाबाद स्टेशनवर, अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर थांबविण्यात आली आहे.