कोरोना महामारी सुरु असताना रामदेव बाबा विरुद्ध ऍलोपॅथी असे वाप्युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्व पॅथीतील डॉक्टरांना रुग्णसेवेची शपथ देताना रुग्णाचे आरोग्य प्रथम ही एकमेव शिकवण दिली जात असेल तर सध्या सुरू असलेल्या चिखलफेकीला त्या त्या पॅथीतील औषधांचा मार्केटिंग फंडा समजावा का ?
एखाद्या औषधावरून एका पॅथीकडून दुसऱया पॅथीवर जेव्हा टीका होते, त्यावेळी सर्वाधिक दुष्परिणाम रुग्णावर होत असून त्यामुळे अधिक दिशाभूल होते. अशावेळी हे टीका करणारे रुग्णाभिमुख असू शकतात का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुळात एखाद्या पॅथीवर बोलण्याचा अधिकार त्या त्या पॅथीतील संशोधकांनाच असू शकतो. मात्र डॉक्टर किंवा प्रसिद्ध वैदू यावर टीका करताना अधिक दिसून येत आहेत. असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञही सांगतात. समोरच्या पॅथीतील औषधावर किंवा पर्यायाने त्या पॅथीवर टीका करून किंवा आपले औषध कसे विज्ञाननिष्ठ असल्याचे सांगणे हे त्या औषधाचे मार्केटिंग करण्यासारखे आहे, हेच मुळात विज्ञाननिष्ठ नाही. औषधोपचारातून रुग्णाला बरे करून पूर्ववत न करता रुग्णाला अधिक गोंधळात टाकणे म्हणजे वैद्यकीय पेशाच्या शपथेशी केलेली प्रतारणा म्हणावी लागेल. हा अवैज्ञानिक हिणकस प्रकार वैद्यकीय तज्ञांकडून घडत आहे.
एखाद्या औषधाची उपयुक्तता किंवा उणिवा संशोधकच मांडू शकतो. या ठिकाणी ऍलोपॅथीतील बॅरलगॉन या पोटदुखीवरील औषधाचे उदाहरण देणे उचित ठरू शकते. पूर्वी बॅरलगॉन हे औषध पोटदुखीवर वापरात होते. या औषधावर ऍलोपॅथीतील संशोधकांनी टीका केल्याने बंद केले तर पाजमो प्रॉक्सिवन वेदनाशामक औषधात अफूचा वापर करण्यात येत असल्याने त्याचा दुरुपयोग होऊ लागल्यानंतर ते बंद केले. कोरोना उपचारात सध्या रेमेडिसवीर, प्लाझ्मा थेरपी सारख्या उपचारावर संशोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने ही औषधे मागे पडली. ऍलोपॅथीतील संशोधकांनी अभ्यासपूर्ण आक्षेप घेतले. यातून ऍलोपॅथी संशोधकांचा मोठेपणाच दिसून येतो.
दरम्यान कोरोनाच्या महामारीत कोणतीही पॅथी परिपूर्ण नसल्याची शंका सर्वसामान्य उपस्थित करत आहेत. ऍलोपॅथीतील अजिथ्रोमायसिन पासून टॉसिलीझूमबपर्यंत औषधे रुग्णाच्या गंभीर स्थितीप्रमाणे वापरण्यात आली. वेळेनुसार त्यात बदल करण्यात येत आहे तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसारख्या जीवनदायी प्रणालीने रुग्णांना मदत होत आहे. तसेच आयुर्वेदात रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याचे विविध काढे सुचविण्यात आले, रामदेव बाबा यांचे कोरोनील औषध कोरोनाला नियंत्रित करत असल्याचा दावा केला तसेच होमिओपॅथीतून अर्सेनिक 200 पासून ते दुसऱया लाटेत मार्कसोल औषधाने कोरोनाला नियंत्रित केले असल्याचा दावा करण्यात आला. हे देखील एक रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे बूस्टर असल्याचे होमिओपॅथ तज्ञांकडून सांगण्यात आले. तसेच सेव्हन हिलसारख्या मुंबईतील पालिका कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्ण फक्त वाफेच्या उपचारातून बरे झाले असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व उपचार औषधांचे ट्रायल आणि अभ्यास प्रबंध डॉक्टरांकडे आहेत. सर्व पॅथीतील औषधांच्या परिणामकारकतेने मुंबई 95 टक्के सावरली जात आहे. मात्र त्या त्या पॅथीतील औषधांचे यश प्रत्येकाने काबूल न करता टीकेवर भर दिला जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पॅथी पॅथीतील भांडणांमुळे औषधातील परिणामकारकता सर्वांसमोर न येता फक्त पॅथीतील द्वेष दिसून येत आहे. अशा आततायी पॅथीअंतर्गत टीकांमुळे रुग्ण गोंधळात पडला आहे. कोरोना महामारीच्या भयानक परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना जीव वाचवणारे औषध हवे आहे. मात्र तसे न होता आपल्या पॅथीतील औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा औषधाची परिणामकारकता न सांगता प्रतिस्पर्धी औषधावर टीका करून नकारात्मकतेने मांडण्यात येतो. अशावेळी एखाद्या विशिष्ट कंपनीच्या औषधाची मार्केटिंग तर करत नाहीत ना अशीही शंका उपस्थित करण्यास अधिक वाव आहे. रुग्णाला जीव वाचवताना जीवन रक्षक औषध हवे आहे. त्यांना पॅथीमधील लढाईत रस मुळीच नाही. ज्या पॅथीतील औषध जीव वाचवते ते त्यांना महत्त्वाचे आहे. वर्षभरापूर्वी आलेला कोरोना विषाणू हा सर्व जगालाच नवीन आहे.
वर्षभरानंतर संशोधक आता कुठे विषाणूला समजू लागले आहेत. तरीही विषाणू मानव निर्मित असल्याने त्याची वर्तणूक सतत बदलती आहे. अर्थात त्यावर उपचारदेखील बदलते ठेवावे लागणार हेही स्पष्ट होत आहे. मग हे बदलते उपचार कोणत्याही पॅथीतील असू शकतात. त्यात कोरोना महामारीमुळे सर्व जग मेटाकुटीस आले असताना एखाद्या विशिष्ट पॅथीतील उपचारावरून पॅथी पॅथी मध्ये टीका होणे हे दुर्दैवी आहे. जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाला जग वैश्विक जैविक युद्ध म्हणून पाहत आहे. पूर्वीची युद्धे सीमेवर जल-स्थळ-वायू सेनेकडून लढली जात होती. मात्र जैविक युद्ध असल्याने ही युद्धे त्या त्या राष्ट्रात आरोग्य सेनेकडून लढली जात आहेत. प्रत्येक राष्ट्रात तीन सेना मानल्या जात असून कोरोनाच्या युद्धात आरोग्यावर उपचार करणाऱया प्रत्येक पॅथी सेना मानल्या जात आहेत. यात योग, नॅचरोपॅथीदेखील समाविष्ट आहेत. या पॅथींनी दिशा ठरवून परस्परातील हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रितपणे कोरोनावर उपचार केल्यास विषाणू संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते.
मात्र महामारीच्या या जीवन मरणाच्या स्थितीतून जात असताना कोणतीही एखादी पॅथी विषाणू समूळ प्रतिबंधाचा एकत्रित दावा करताना दिसून येत नाही. याला कारण पॅथी पॅथीमधील हेवेदावे असून पॅथीमधील तज्ञ देखील गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येतात. याचा अर्थ गेले वर्षभर सर्व पॅथीतील वैद्यकीय तज्ञ उपचार करत असले ते प्रयोग स्वरूपात आहेत का अशी शंका उपस्थित होत आहे. असे प्रयोग देखील वावगे नसून स्वागतार्ह आहेत. मात्र एकमेकांचे पाय खेचून अहं ब्रह्मास्मिचा अविर्भाव सर्वसामान्यांचा जीव वाचविणारा नक्की नाही असे खेदाने म्हणावे लागत आहे. यातून पाय खेचण्याची ही टीका नक्कीच नफेखोरीकडे जात आहे का अशी शंका कोरोनाने गांजलेल्याना पडल्यास वैद्यकीय उपचारावरून विश्वासच उडून जाईल. यातून कोरोना विरोधातील युद्ध जिंकण्याचे राहून जाईल.
राम खांदारे