प्रतिनिधी / इस्लामपूर
येथील रयत ऍग्रोच्या कडकनाथ कोंबडी घोटाळयात फसलेल्या पन्हाळा तालुक्यातील मसुदमालेच्या प्रमोद सर्जेराव जमदाडे (29) या तरुणाने आत्महत्या केल्याने संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. याप्रश्नी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून दि. 24 रोजी दुपारी 12 वा कोल्हापूर शिरोलीनाका व दि. 27 रोजी महामार्गावरील वाघवाडी फाटा येथे चक्काजाम आंदोलन होईल, अशी माहिती कडकनाथ कोंबडीपालक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ.दिग्विजय पाटील यांनी पत्रकाव्दारे †िदली.
त्यांनी म्हटले आहे की, प्रमोद यास परिस्थितीमुळे आत्महत्या करावी लागली. याप्रकरणी संबंधीतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा. या प्रश्नातून तिघांचा बळी गेला आहे. पाठीमागील सरकारकडे पाठपुरावा करुन दखल घेतली नाही. सध्याचे ठाकरे सरकार पाथर्डीतल्या साईंच्या जन्म ठिकाणाच्या विकासासाठी कोटयावधी रुपये देण्याच्या गोष्टी करीत आहे. साई भक्तांची आंदोलने हाताळणाऱया या सरकारला शेतकऱयांचे आंदोलन दिसत नाही. कडकनाथ प्रकरणात माजी मंत्री व त्यांच्या सुपुत्रांचा उल्लेख शेतकरी बांधव करीत असतानाही तत्कालीन व सध्याचे सरकार त्यांना वाचवण्याचे राजकारण करीत आहे.
पोलीस प्रशासनाकडून अजूनही काही ठिकाणी अन्याय झालेल्या लोकांच्या तक्रारी दाखल करुन घेतल्या जात नाहीत. दि. 17 जानेवारी रोजी इस्लामपूर येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून कारवाईसाठी निवेदन दिले. पण सरकार व या सरकारमधील मंत्री तटस्थपणाची भूमिका घेत आहे. सरकार असेच चालणार असेल तर शेतकऱयांच्या न्यायासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा आदर्श ठेवून प्रतिसरकार निर्माण करण्याची तयारी करावी लागेल, असा इशारा दिला आहे.