वार्ताहर /कडोली
डांबरीकरणाच्या नावाखाली कडोली-आंबेवाडी संपर्क रस्ता उखडून टाकण्यात आल्याने वाहनचालक व शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
उचगाव, मण्णूर, हिंडलगा, आंबेवाडी, सुळगा(हिं.) आणि पश्चिमेकडील भागाशी साधणारा कडोली, आंबेवाडी हा संपर्क रस्ता सर्वांसाठी महत्त्वाचा असून हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी या भागातून केली होती. याची दखल घेऊन शासनाने डांबरीकरण करण्यासाठी नाबार्ड योजनेतून निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या उद्देशाने संबंधित अभियंत्यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता उखडून टाकला आहे. तेव्हापासून संबंधित खात्याने कोणतीही कृती केली नाही. खडी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली. शिवाय शेतकऱयांचे तर अतोनात हाल होत आहेत. रस्त्यावर बैलगाडी हाकणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. बैलांच्या पायांना खडी लागून जखमा होत आहेत. अशा या रस्त्याकडे संबंधित खात्याबरोबर कडोली ग्रा. पं. नेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहतूकधारक आणि शेतकऱयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ग्राम पंचायतीने याकडे लक्ष घालून संबंधित खात्याला कळविणे गरजेचे आहे.