विविध आजारांचा फैलाव होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव/प्रतिनिधी
कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये असलेला कत्तलखाना बंद करण्याचा मुद्दा गेल्या काही बैठकांमध्ये गाजला आहे. अद्यापही या मुद्दय़ावर पडदा पडला नाही. त्यामुळे बुधवारी झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत कत्तलखाना बंद करण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा झाली. कत्तलखाना बंद करू नये, अशी भूमिका सदस्यांनी घेतली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार कत्तलखाना हटविणे बंधनकारक आहे, असे कॅन्टोन्मेंटच्यावतीने सांगण्यात आले. याबाबत एकमत झाले नसल्याने पाहणी करून निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले.
कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये असलेल्या कत्तलखान्याचे सांडपाणी नाल्यामध्ये सोडण्यात आले आहे. प्रदूषण वाढत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने कॅन्टोन्मेंटला नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीच्या अजेंडय़ावर हा विषय घेण्यात आला होता. याबाबत बराच वेळ चर्चा झाली. 1974 मध्ये हा कत्तलखाना उभारण्यात आला आहे. पण या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला नसल्याने वायू आणि जल प्रदूषण होत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. हरित लवाद आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रहिवासी वसाहतीमध्ये कत्तलखाना सुरू करू नये, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने कॅन्टोन्मेंट बोर्डला केली होती. त्यामुळे कत्तलखाना बंद करून शहराबाहेर सुरू करण्याबाबत कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पण शहराबाहेर कत्तलखाना सुरू केल्यानंतरच हा कत्तलखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंटने घेतला होता. याकरिता निविदा काढून कंत्राटदारही निश्चित केला होता. पण हे काम झाले नाही. मंजुरी दिल्यानंतरही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प का उभारण्यात आला नाही, असा मुद्दा डॉ. मदन डोंगरे यांनी उपस्थित केला. सदर ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करून कत्तलखाना सुरू ठेवण्यात यावा, असा आग्रह लोकनियुक्त सदस्यांनी धरला.
कत्तलखाना सुरू ठेवण्याबाबत आपले दुमत नाही, पण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी कत्तलखाना हटवित नाही. शहराची व्याप्ती वाढत चालली असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विविध आजारांचा फैलाव होत असल्याने कत्तलखाना शहराबाहेर असणे गरजेचे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार कत्तलखाना बंद करून अन्य ठिकाणी सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यास हरकत नसल्याचे मत कॅन्टोन्मेंट बोर्डचे नवनिर्वाचित अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी व्यक्त केले. मात्र, कत्तलखाना स्थलांतर आणि बंद करण्याबाबत एकमत झाले नाही. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला..