चिपळूण
चिपळुणातील गोवंश हत्या प्रकरणानंतरही अद्यापही गुरे वाहतुकीची तस्करी थांबलेली नाही. पोलिसांची नाकांबंदी सुरु असतानाच चिपळूणकडून तब्बल 16 बैल घेऊन जाणारा आयशर ट्रक सावर्डे पोलिसांनी पकडल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी मध्यरात्री 2.30च्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे 16 बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली ट्रकचालकाने दिली आहे.
दाऊद मेहबूब दफेदार (46, शनिवार पेठ, मुजावर कॉलनी, कराड) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तसेच बाब शेख (पाटण), संतोष कदम (वेताळवाडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी लागोपाठ रस्त्यालगत चिपळूण तालुक्यातील कामथे व पिंपळी या ठिकाणी गोवंश हत्येच्या घटना घडल्यानंतर हा प्रकार रोखण्यासाठी व मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असतानाच सावर्डे पोलीस मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे-वहाळ फाटा येथे नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करत होते. या दरम्यान वहाळफाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास चिपळूणकडून आलेला एक संशयित आयशर ट्रक पोलिसांना दिसल्यानंतर त्यास थांबवून त्याची तपासणी केली असता या ट्रकच्या हौद्यात दाटीवटीने 16 बैल दोरीने बांधल्याचे पोलिसांना दिसले.
या 16 बैलाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता हे बैल बाब शेख यांच्या सांगण्यावरुन संतोष कदम यांच्याकडून घेऊन ते कत्तलीसाठी कराड येथील कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची कबुली ट्रकचालक दफेदार याने दिली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडील 13 लाख 9 हजार किंमतीचा आयशर ट्रक जप्त करण्यात आला. ही करवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावर्डेचे पोलीस निरीक्षक सी. जी. लाड, हेडकॉन्स्टेबल प्रदीप गमरे, दीपक करजवकर, तुकाराम पवार, राजेंद्र आरवट, राजेश चव्हाण, अभिषेक वेलवणकर, संदीप गुरव, प्रशांत पाटील, प्रितम सूर्यवंशी आदींच्या पोलीस पथकासह सावर्डे पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील आनंद मोहिते (नांदगाव), महेश कांबळे (नांदगाव खुर्द), संजय कदम (फुरुस), विलास सावंत (कोसबी), प्रभाकर पाष्टे (असुडे), संतोष चव्हाण (येगाव), बळीराम साळुखे (पाते) यांनी केली.
चिपळुणातील घटनेनंतर पहिलीच कारवाई
काही दिवसांपूर्वी कामथे व पिंपळी येथे गोवंश हत्या घडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. असे प्रकार रोखण्याची मागणी नागरिकांनी पोलीस अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली होती. या प्रकारानंतर तत्काळ पोलिसांनी तालुक्यातील 9 ठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी सुरु केली आहे. यामुळे गुरे वाहतूक करणाऱया ट्रकवर ही पहिलीच कारवाई करण्यात आली.
गुरे वाहतुकीचे खेडमध्ये कनेक्शन?
पाटणमधील बाब शेख याच्या सांगण्यावरुन खेड येथील संतोष कदम याच्याकडून हे 16 बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता गुरे वाहतुकीचे कनेक्शन खेडमध्ये असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संतोष कदम याने ही गुरे कोठून व कशी आणली, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे चौकशीअंती पुढे येणार आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
दरम्यान, तालुक्यात अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याचे तसेच त्यासारखा प्रकार निदर्शनास आल्यास त्या बाबत तत्काळ संबंधित पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.