जिल्हा प्रशासनाच्यावतीने जयंती साजरी : समाजामध्ये अमुलाग्र बदल झाल्याने कनकदास ठरले श्रेष्ट व्यक्तिमत्त्व
प्रतिनिधी /बेळगाव
कनकदासांनी आपल्या साहित्य व कीर्तनातून जीवनाचे धडे समाजाला दिले आहेत. जात, पंत, कुळ याचा भेदभाव न करता समाजाने एकत्रपणे राहिले पाहिजे. समाजातील वाईट गोष्टी दूर केल्या पाहिजे, असे सांगून त्यांनी समाजाला एक वेगळा संदेश दिला होता. त्यांच्या या संदेशावर समाजामध्ये अमुलाग्र बदल झाल्याने कनकदास हे श्रेष्ट व्यक्तिमत्व ठरले आहेत, असे डॉ. एच. बी. कोलकार यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृतिक विभाग आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कनकदास व ओनके वोब्बवा जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम झाला. त्यामध्ये त्यांनी कनकदास यांच्या जीवनाचा उलगडा केला.
कुळाच्या आधारावर कोणीही बोलू नये. याचबरोबर जात, पंत हे बाजूला ठेवले पाहिजे. समाजामध्ये समानता, शांतता आणि प्रगती साधायची असेल तर त्यांचा आदर्श आजही समाजाने घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ओनके ओब्बवा यांच्या जीवनाबद्दल डॉ. विजयालक्ष्मी पुट्टी म्हणाल्या, एक शूर महिलेने लढाई करुन किल्ल्याचे रक्षण केले. हैदरअलीच्या शेकडो सैन्यांना त्यांनी ठार मारले. त्यावेळी लढलेले त्यांचे जे योगदान आहे ते प्रत्येक महिलेने अनुकरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रदुर्ग किल्ल्यावर शत्रुंची घुसमट झाली. ती आजही इतिहासात नोंद आहे. एका महिलेने केलेली ही लढाई सर्वांसमोर आदर्श असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी बलराम चव्हाण, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, मागासवर्गीय कल्याण खात्याचे अधिकारी लक्ष्मण बाबली, अनुसूचित जाती कल्याण विभागाचे बसवराज कुरीहुली, अशोक सदलगी, प्राचार्य बी. जी. धारवाड आदी उपस्थित होते.
बुडा कार्यालयापासून कनकदास व ओनके वोब्बवा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विविध कलापथकांनी भाग घेतला होता. यामध्ये खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, उपायुक्त रविंद्र गडादी, महापालिका आयुक्त रुदेश घाळी आदी उपस्थित होते.