2025 पूर्वी योजना कार्यान्वित होणार, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश बैलूरकर यांची माहिती : नगरपंचायत सभागृहात स्थायी समितीची बैठक
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन नगरपंचायतीने नवीन पाणीपुरवठा योजनेची मागणी केली होती. शासनाने त्याची दखल घेऊन नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. यासाठी 22 कोटी रु. चे अनुदान मंजूर केले असून येत्या काही दिवसात या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. नगरपंचायतीच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. मुख्याधिकारी बाबासाहेब माने यांनी बैठकीबाबत माहिती दिली.
कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाकडून ही योजना राबविली जाणार आहे. शहराच्या जुन्या पाणीपुरवठा योजना निकामी झाल्या असल्याने शहरातील संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात येणार आहे. तसेच सध्या असलेल्या ठिकाणी नव्याने मोठी जॅकवेल बांधण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आंबेडकर उद्यानात दीड लाख लिटरचा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. व जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्णपणे आधुनिक करण्यात येणार आहे. यासाठी दोन स्वतंत्र जलकुंभ व आधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणेच्या माध्यमातून शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 2025 पूर्वी ही योजना पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच जलजीवन मिशनच्या अंतर्गत ‘हर घर नळ’ या योजनेसाठी एका एनजीओला शहरातील सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे.
शहरासाठी नगरोत्थान योजनेसाठी 5 कोटी रु. चे अनुदान मंजूर झाले आहे. यातून विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत. तसेच सांडपाणी प्रकल्पासाठी 7 कोटी रु. चा निधी मंजूर झाला आहे. नुकतेच प्रदूषण अधिकाऱयानी मलप्रभा नदीच्या पात्राचे सर्वेक्षण केले असून मलप्रभा नदीत मिसळणाऱया सांडपाण्याच्या बाबतीत तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. या 7 कोटीच्या निधीतून मलप्रभा नदीत मिसळणाऱया सांडपाण्याचे एकत्रिकरण करून शुद्धीकरण करण्यात येणार आहे. येथील मोक्षधाम स्मशानभूमीचाही विकास करण्याचे ठरविण्यात आले. तसेच रुमेवाडी क्रॉस ते मऱयाम्मा मंदिरपर्यंतच्या शहरांतर्गत जाणाऱया महामार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते तसेच रस्ते प्राधिकरणच्या अधिकाऱयांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे.
अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात चर्चा
शहरातील बेकायदेशीर बांधकामे तसेच अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात चर्चा झाली. विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात यावी, अशाही सूचना प्रकाश बैलूरकर यांनी दिल्या. खानापूर येथील कार्यकर्ते जयंत तिनईकर यांनी शहरातील करवसुली संदर्भात नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. सामान्य माणसांना करवसुलीसाठी नाहक त्रास दिला जातो. मात्र काही धनाढय़ांकडे लाखानी थकबाकी असल्याने ती प्रथम वसूल करावी, अन्यथा पत्रके काढून सामान्य नागरिकांना कर न भरण्याचे आवाहन करणार असल्याचे बैठकीमध्ये सांगितले. तसेच शहरात होत असलेल्या अनधिकृत शेड उभारणीबाबतही प्रश्न उपस्थित केला.
या बैठकीला उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, विनोद पाटील, अप्पय्या कोडोळी, राजश्री तोपिनकट्टी, सायरा सनदी उपस्थित होते.