प्रतिनिधी / बेळगाव
ताशिलदार गल्ली कॉर्नरवरील भुयारी गटार तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी पावसाचे पाणी आणि सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असून रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पण काम अर्धवट करण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ताशिलदार गल्ली आणि भांदूर गल्लीच्या कॉर्नरजवळ पाटील गल्ली रस्त्यावर गटारींना जोडण्यासाठी भुयारी गटार आहे. पण सदर गटार स्लोप नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. या ठिकाणी सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. भुयारी गटारीमध्ये कचरा साचल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांनी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रार केली. पण याची दखल घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
गटार खुली करण्याची आवश्यकता असल्याने मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्याची सूचना करण्यात आली होती. याची पाहणी महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्यांनी केली होती. तसेच गटारीचे बांधकाम करण्यात येईल, असे सांगितले होते. पण याची दखल अद्यापही घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. भुयारी गटारीची पाहणी करण्यात आली आहे. पण पुढील कार्यवाही झाली नाही. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले, पण सर्व्हिस रोड आणि गटारी बांधण्याचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. यामुळे येथील समस्येचे तातडीने निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
ताशिलदार गल्ली येथील भंगीबोळामधून ड्रेनेज वाहिनी घालण्याचे काम करण्यात आले. मात्र ड्रेनेज वाहिनी घालण्यात आल्यानंतर मातीचे ढिगारे हटवून रस्ता व्यवस्थित करण्याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले आहे. परिणामी रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिक भंगीबोळात कचरा टाकत असल्याने मातीच्या ढिगाऱयावर कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. रस्ता व्यवस्थित नसल्याने कचऱयाची उचल करण्याकडे स्वच्छता कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कचरा साचून रहात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांकडे नागरिकांनी तक्रार करूनही याची दखल घेतली नाही. मातीचे ढिगारे हटविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. यामुळे स्वच्छता विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून एकामेकाकडे जबाबदारी ढकलण्याचा प्रकार अधिकाऱयांनी चालविला आहे. यामुळे नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी माती आणि कचऱयाची उचल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.