स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहांची दुरवस्था : भारतनगर क्रॉस नं.1 येथील चर्मकार समाजातील नागरिकांना करावा लागतोय अनेक गैरसोयींचा सामना : सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
भारतनगर क्रॉस नं. 1 येथील चर्मकार समाजातील नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अलीकडे नागरी सुविधा पुरविण्यासदेखील महापालिका अपयशी ठरली आहे. येथील स्वच्छतागृहांना ना दरवाजे आहेत, ना पाणी आहे. तरीदेखील बेळगाव स्मार्ट सिटी असल्याचा कांगावा केला जातो. त्यामुळे प्रथम नागरी सुविधा पुरवा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
चर्मकार वसाहतीमधील नागरिकांना स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत आहे. शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी हजार कोटीचा निधी खर्च करण्यात येत आहे. पण काही भागातील स्वच्छतागृहांची अवस्था एकदम बिकट झाली आहे. विशेषतः भारतनगर क्रॉस पहिला येथील चर्मकार वसाहतीमधील नागरिकांसाठी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. ना दरवाजा… ना स्वच्छता राखण्यासाठी पाणी आहे. मात्र संपूर्ण शहर स्वच्छ असल्याचा दावा केला जातो. इतकेच नव्हे तर बेळगाव स्मार्ट सिटी असल्याचा कांगावा केला जातो. पण साध्या नागरी सुविधा उपलब्ध करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. येथील स्वच्छतागृहाचे दरवाजे मोडकळीस आले असून नळांना पाणी नाही. या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीमधील पाणी हिरवे झाले असून किडे झाले आहेत. तसेच स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता करण्याची मागणी महापालिकेकडे केली जाते. तसेच स्वच्छता कामगारांनादेखील सांगण्यात येते. पण याची दखल घेतली जात नाही. परिणामी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनपा अधिकाऱयांनी लक्ष घालून येथील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.
हीच स्मार्ट सिटी आहे का?- सुहासिनी शिंदे
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. पण स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, हीच स्मार्ट सिटी आहे का? असा मुद्दा सुहासिनी शिंदे यांनी उपस्थित केला.
महापालिकेच्या अधिकाऱयांचा कानाडोळा- सुनंदा कांबळे
स्वच्छतागृहाला दरवाजे नसल्याने मोठी गैरसोय होते. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयाकडे तक्रार केली होती. पण आश्वासन देण्यात आले. येथील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सुनंदा कांबळे यांनी केली.
चर्मकार समाजाला नागरी सुविधा पुरविण्याबाबत दुजाभाव- इंद्रायणी पवार
चर्मकार वसाहतीमधील रहिवाशांच्या समस्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. विविध समाजातील नागरिकांना प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. पण चर्मकार समाजाला नागरी सुविधा पुरविण्याबाबत दुजाभाव केला जातो. वास्तविक पाहता प्रत्येक समाजाला न्याय मिळायला हवा. पण स्वच्छतागृहासारख्या नागरी सुविधाही उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरली असल्याची टीका इंद्रायणी पवार यांनी केली.
समस्यांची पाहणी करून निवारण करावे- अमर चव्हाण
स्वच्छतागृह आहे पण पाणी नाही, स्वच्छता नाही आणि दरवाजेदेखील नाहीत. सांगा बरं या स्वच्छतागृहाचा वापर कसा करायचा. केवळ नावाला स्वच्छतागृहे आहेत. नळांना कधीच पाणी नसते. या ठिकाणी पाण्याची टाकी आहे पण पाणी भरण्यात येत नसल्याने शेवाळ पसरले आहे. त्यामुळे प्रथम येथील समस्यांची पाहणी करून निवारण करण्यात यावे, तसेच स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अमर चव्हाण यांनी केली.