बेळगाव / प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यात इदलहोंड येथे होणाऱया गुंफण साहित्य संमलेनामध्ये आम्हा साहित्यिकांना रोखण्यात आले. ही घटना प्रगल्भ असणाऱया कर्नाटकाच्या संत परंपरेला काळीमा फासणारी आहे. कानडीमध्ये संत बसवेश्वर, एस. एल. भैरप्पा, गिरीश कर्नाड यांच्यासारख्या थोर साहित्यिकांनी ही संस्कृती समृद्ध केली असताना, अशा पद्धतीने मराठी संमेलनाला विरोध करून स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार व पोलिसांचा केला असल्याने मी याचा जाहीर निषेध करतो, असा हल्लाबोल ज्ये÷ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला.
रविवारी गुंफण साहित्य अकादमी, सातारा यांच्या सहकार्यातून इदलहोंड येथे 17 व्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी 79 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली होती. परंतु त्यांना रविवारी सकाळी पोलिसांनी साहित्य संमेलनाला जाण्यापासून रोखले. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी या संमेलनास हजेरी लावल्यास त्यांना अटक करू, अशी धमकी देण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या या साहित्यिकांनी बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपला रोष व्यक्त केला. इदलहोंड संमेलनस्थळी जाण्यास रोखल्याने श्रीपाल सबनीस यांनी बेळगाव येथूनच गुंफण साहित्य संमेलनाचे उद्घाटन करीत असल्याची घोषणा केली.
विरोध कन्नड भाषेला नाहीच
आमचा विरोध हा कन्नड भाषेला नाहीच. मराठी व कन्नड या दोन्ही भाषा भगिनी आहेत. परंतु कर्नाटकातील काही माथेफिरू बेताल वक्तव्ये करून येथे तेढ निर्माण करीत आहेत. पण आम्ही असल्या माथेफिरूंना भीक घालत नाही. अशा अनेक पाटलांना महाराष्ट्र पुरून उरलेला आहे.
सध्या महाराष्ट्रातील संमेलनांमध्ये सीमाप्रश्नाचे केवळ ठराव मांडले जात आहेत. परंतु ठराव मांडून ही समस्या सुटणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सीमाप्रश्नाबद्दल घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद असून, मी या सरकारचे अभिनंदन करतो. यापुढेही उद्धव ठाकरे सरकारने सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करत रहावा, असे त्यांनी सांगितले. साहित्यावर घाला घालून संस्कृती संपविण्याचा हा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असला तरी तो प्रयत्न मराठी साहित्यिक यशस्वी होऊ देणार नाही. असे श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.
ही तर हिटलरशाही
मराठी संस्कृतीची जोपासना व्हावी, याकरिता सीमाभागातील गावागावामध्ये साहित्य संमेलने घेतली जात जातात. परंतु मराठी साहित्यिकांना जर या संमेलनांना येऊ दिले जात नसेल तर ही एक प्रकारची हिटलरशाही आहे. मराठी साहित्यिकांना तर दहशतवाद्यांप्रमाणे वागविले जात आहे. त्यामुळे या सरकारचा मी निषेध करतो, अशा शब्दात सबनीस यांनी आपला रोष व्यक्त केला.
यावेळी गुंफण साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष बबन पोतदार, ललिता श्रीपाल सबनीस, मुकुंदराव महामनी, निवृत्ती शिवाजी फाटक, प्रवीन शिंगवी, आत्माराम हारे, चंद्रकांत जोडदंड यासह इतर साहित्यिक उपस्थित होते.