परवाचीच गोष्ट. हरिदासचा मुलगा भेटायला आला होता. आल्या आल्या माझ्या पाया पडला. मग खुर्चीवर बसला. पाणी प्यायल्यावर एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, “तुम्हाला एक गोड बातमी सांगायची आहे.’’
“सांग.’’
“गोड बातमी आहे. बातमी गोड आहे. तुम्हाला ती सांगणार आहे. सांगणार आहे मी तुम्हाला ती बातमी,’’ तो पुन्हा म्हणाला.
“सांग ना, वाट कसली बघतो आहेस?’’
“वाट का बघीन? का बघीन मी वाट? तुम्हाला गोड बातमी सांगायलाच आलो आहे मी. मी आलो आहे तो तुम्हाला गोड बातमी सांगायलाच. मी -’’
“आता बातमी सांगितली नाहीस तर कानफटात हाणीन, बघ,’’ मी त्याला मध्येच अडवत रागाने म्हणालो. तेव्हा त्याने जीभ चावली, डोळे मिटून दीर्घ श्वसन केले आणि डोळे उघडून म्हणाला, “माझं लग्न ठरलंय. माझं -’’
“पुढचं वाक्मय बोलण्याआधी एका शब्दात उत्तर दे. निमंत्रण पत्रिका आणलीस का? हो की नाही?’’
“हो. मी तुम्हाला -’’
“पुढचं वाक्मय बोलण्याआधी ती दे.’’ त्याने दिली. मग मी पुन्हा दरडावले, “मी ही वाचेपर्यंत एक अक्षर बोललास तर खबरदार.’’ मी लग्नाची तारीख, वेळ, मंगल कार्यालयाचे नाव-पत्ता वाचले.
“तू चहा घेशील की कॉफी? एका शब्दात सांग.’’
“अं… नको. मी -’’
“समजलो. पुढचं स्पष्टीकरण नको.’’ मी आत जाऊन साखरेचा डबा आणला आणि त्याच्या हातावर चिमूटभर साखर ठेवली. मी त्याचं अभिनंदन केलं. मग तो तिला मला सांगणार इतक्मयात मी त्याला म्हणालो, “काय रे बंडय़ा, तू टीव्हीवर मराठीत बातम्या सांगतोस का?’’ हे ऐकून तो दचकलाच. जाम चकित झाला. उत्तेजित स्वरात त्याने विचारले, “होय मी… तुम्हाला कसे समजले?’’
“ते एक गुपित आहे. गुपित आहे ते एक. एक आहे ते गुपित…’’ मी बोलू लागलो. आता त्याने मला अडवले आणि थोडा ओशाळून म्हणाला, “समजले, काका. पण -’’
“पुढे बोलू नकोस. समजले नं तुला? त्यातच आनंद आहे. आणि लग्न केल्यावर बायकोशी थोडक्मयात बोल हो.’’
“काका, ती पण आमच्याच वाहिनीमध्ये निवेदक आहे,’’ तो म्हणाला.
मी कपाळावर हात मारून घेतला.