बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना काळात देशभरात लॉकडाऊनमुळे देशातील हजारो कंपन्या बंद पडल्या. गेल्या एका वर्षात कर्नाटकसह संपूर्ण दक्षिण राज्यात हजारो कंपन्या बंद झाल्या आहेत. एकट्या कर्नाटकातच ८०० हून अधिक कंपन्या कायमच्या बंद झाल्या आहेत.
कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने एमसीए अशा कंपन्यांचा डेटा सादर केला आहे. एमसीएच्या अद्ययावत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशभरातील एकूण १०,११३ बंद कंपन्यांपैकी कर्नाटकातील ८३६ कंपन्या बंद झाल्या आहेत.
दरम्यान तामिळनाडूतील १,३२२ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ आणि केरळमधील ३०७ कंपन्या कायमसाठी बंद झाल्या. याशिवाय गोव्यातील ३६ कंपन्या आणि पुडुचेरीच्या ३१ कंपन्याही बंद पडल्या आहेत. एमसीएच्या यादीमध्ये आंध्र प्रदेशचे नाव नाही, त्यामुळे तेथील कोणत्याही कंपन्या बंद पडल्या नसल्याचे समजले आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की कंपनी अॅक्ट, २०१३, च्या कलम २४८ (२) नुसार एप्रिल -२०२० ते फेब्रुवारी -२०२१ या कालावधीत देशात एकूण १०,११३ कंपन्या बंद झाल्या होत्या. कलम २४८ (२) म्हणजे कंपन्यांनी स्वेच्छेने त्यांचे व्यवसाय बंद केले.