मंडलिक यांच्या प्रचारार्थ यादवनगर येथे सभा
कोल्हापूर :
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानात बदल केला जाणार असल्याचा कॉंग्रेसकडून सुरू असलेला अपप्रचार बालिशपणाचा आहे. संविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. असा हल्लाबोल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.
महायुतीचे शिवसेना उमेदवार खास. प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ चांदणी चौक, यादवनगर येथील कोपरा सभेत ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, संविधानाविषयी जनतेत पसरविण्यात येणारा गैरसमज आणि कोल्हापूरच्या गादीचा पदोपदी अवमान फक्त कॉंग्रेसनेच केला आहे. त्यामुळे जी निवडणूक विकासाच्या मुद्यावर होणे अपेक्षित होते, ती निवडणूक अफवा, अपप्रचार आणि व्यक्तिगत टीकेवर घेवून जाण्यास कॉंग्रेस आणि त्यांचे राक्षसी प्रवृत्तीचे नेतेमंडळी कारणीभूत आहेत. भारतरत्न डॉ. आंबेडकर निवडणुकीला उभारले असताना त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत करण्याचे काम कॉंग्रेसने केले. हा अवमान आजही जनता विसरली नाही आहे. छत्रपती घराण्याला राज्यसभेवर घेवून एन.डी.ए. महायुतीने राजघराण्याचा सन्मानच केला आहे. पण, समोर पराभव दिसल्याने आपल्या गळ्यातील उमेदवारीची माळ राजघराण्याच्या गळ्यात कॉंग्रेस नेत्याने घातली. स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचा बळी द्यायची वृत्ती कॉंग्रेसची असून, अशा राक्षसी प्रवृत्तीला कायमचे गाडण्यासाठी महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, दादू शिंदे, सागर सोनटक्के, संदीप व्हगडे, गब्बर मुल्ला, अनिल चव्हाण, देवेंद्र खराडे, आदिनाथ साठे, अर्जुन बुचडे, सौ.बेनिझर नदाफ, अभिजित सूर्यवंशी, प्रेमसिंग रजपूत यांच्यासह भागातील नागरिक, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किती डोनेशन घेता? शिक्षकांना कोणती वेतनश्रेणी देता?
राजर्षी शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या. विविध समाजातील संस्थांना होस्टेल बांधण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी जमिनी दिल्या. निधी दिला .हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या .विविध सोयी सवलती दिल्या.
विद्यमान शाहू छत्रपती यांनी गेल्या पन्नास वर्षात कोल्हापूर शहरात शिक्षण क्षेत्रासाठी काय योगदान दिले हा सवाल आहे. शाहू महाराजांचा वारसा सांगणाऱ्या शाहू छत्रपती यांनी प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण देणारी एक शाळा वाड्यात उभी केली आहे. तिथेही गोरगरिबांना शिक्षणाची दारे बंद आहेत .तिथे फक्त डोनेशन देऊ शकणाऱ्या श्रीमंतांच्या मुलांनाच प्रवेश मिळू शकतो. हजारात डोनेशन आणि मोठी फी घेणाऱ्या या शाळेत शिक्षकांना तुटपुंजा पगारावर राबवून घेतले जाते. आमचे हे म्हणणे खोटे असल्यास शाहू विद्यालयाच्या संस्थापकानी त्यांच्या संस्थेतील शिक्षकांना कोणती वेतनश्रेणी दिली जाते ?