बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण आणि बाधितांची संख्या वाढू लागल्याने संसर्ग रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना सरकारची रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत सुरु आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा जीव जात आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी राज्यभरातील १८ वैद्यकीय संस्थांमध्ये २२ ऑक्सिजन प्लांट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात दररोज जवळपास ५० हजार पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे आणि आठ जिल्ह्यांमधील मृत्यूची संख्या १ टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
उपमुख्यमंत्री आणि राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सी.एन. अश्वनाथ नारायण यांनी १८ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने पार पाडली जाईल.” त्यातील तीन प्लांट बेंगळूरमध्ये असणार आहेत. वित्त विभागाने ६२.७ कोटींच्या प्रस्तावाला हिरवाकंदील दाखविला असून निविदा मागविण्यात आल्या आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या या ऑक्सिजन प्रकल्पांमुळे कोरोना काळात खूप मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या भासत असणारी ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे.
मंत्री अश्वनाथ नारायण म्हणाले, “याद्वारे संस्था बाहेरील पुरवठादारांवर अवलंबून न राहता वैद्यकीय ऑक्सिजन स्वतः तयार करु शकतात. यापैकी प्रत्येक प्लांट प्रति मिनिट १,५०० लिटरच्या प्रवाह दरासाठी डिझाइन केली जाईल आणि ऑक्सिजन आवश्यक असलेल्या २५० व्यक्तींच्या गरजा भागवेल.
सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी या अत्यावश्यक निर्णयाचे समर्थन केले. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. सुनील कारंथ म्हणाले, “ही काळाची गरज आहे. ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय संस्था स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे.