कोडगू /प्रतिनिधी
कोडगू जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हा न्यायदंडाधिकारी एनिस कनमणी जॉय यांच्या माहितीनुसार कावेरी नदी-उगमस्थान असलेल्या भगमंडल भागातील ब्रह्मगिरी तालकवेरी येथे भूस्खलनामुळे बुधवारी रात्री चार लोक बेपत्ता झाले होते. तर घरावरुन दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी झाडे व विद्युत खांब उखडले आहेत. नाप्पोली आणि थळकावेरी दरम्यानचा संप्रर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे कावेरी नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्रिवेणी संगममध्येही पाण्याची पातळी वाढत आहे. बेत्री गावाजवळील विराजपेट मडीकेरीला जोडणारा पूल बुडाला आहे.
भारतीय हवामान खात्याचे संचालक सी. एस. पाटील यांच्या माहितीनुसार कोडगू जिल्ह्यात चार- पाच दिवस पाऊस पडणार आहे. त्याच बरोबर उडुपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, चिकमंगळूर, शिवमोगा आणि हसन जिल्ह्यात रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. शिवमोगा आणि चिकमंगळूर येथे झालेल्या पावसामुळे नेत्रावती, तुंग भद्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोडगू जिल्ह्यात मदतकार्यासाठी ५० कोटी रुपये जाहीर केले आहेत.