बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असल्याचे दिसत आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोना मृतांची संख्याही वाढत आहे. एकीकडे राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या कमी करून राज्य सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले आहे.
दरम्यान राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना सकारात्मकतेचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे. आरोग्य तज्ज्ञ वारंवार आणि अधिकाधिक लोकांची कोविड तपासणी करण्याचा सल्ला देत आहे. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी गेल्या महिन्यात राज्यात दररोज दोन लाख नमुन्यांची चाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, आता कोरोना चाचणी दर सातत्याने कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात एक लाखाहूनही कमी नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, तपास दर कमी करून, सरकार कोरोनाच्या तिसर्या लाटेला निमंत्रण देत आहे.